- पवना धरणात 99.75 टक्के साठा : जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन
पिंपरी – मॉन्सून तो आता परतीचा प्रवास सुरु करणार असल्याने यापुढे किती पाऊस पडेल याबाबत साशंकता आहे. यंदा वर्तविलेल्या पावसाच्या एकूण अंदाजाच्या 108 टक्के पाऊस पडला आहे. मात्र, पवना धरणक्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. तरीदेखील नियोजनबद्ध पाणीसाठवणुकीमुळे पवना धरण यंदा 100 टक्के भरले आहे. आजमितीस धरणातील पाणीसाठा 99.75 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला असला तरी पिंपरी-चिंचवडकरांना जुलै 2021 अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
पिंपरी-चिंचवड व मावळातील गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात जमा होणाऱ्या पाणीसाठ्यावर शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. यंदा देशभरात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे बळीराजा सुखावला होता; तर पिंपरी-चिंचवडकरांनादेखील वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला होता. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीला लावलेल्या जोरदार हजेरीनंतर पावसाने दडी मारली. 1 जून रोजी धरणात अवघा 35 टक्के पाणीसाठा होता. जुन आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
ऑगस्ट महिन्यात पावसाचे पुनरागमन झाले. पवना धरणातील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ होऊ लागली. 21 ऑगस्टला धरण 85.75 टक्के भरले होते. गेल्यावर्षी याच काळात धरणात 100 टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असल्याने पाणीसाठ्यातील वाढीकडे सर्वांचे लक्ष होते. 29 ऑगस्टला धरण क्षेत्रात 1543 मिमी पावसाची नोंद झाली होती. ती गेल्यावर्षी 3154 मिमी एवढी झाली होती. 29 ऑगस्टला 98 टक्के धरण भरले होते. 29 ऑगस्टपासून 2200 क्युसेकने धरणाच्या सांडव्यावरुन नदीपात्रात पाणी सोडण्यास सुुरवात करण्यात आली होती.
यंदा केवळ 1687 मिमी पावसाची नोंद
गेल्या वर्षीदेखील पावसाने ओढ दिली होती. मात्र, त्यानंतर समाधानकारक हजेरी लावलेल्या पावसाने सर्वांनाच मोठा दिलासा दिला. पावसाळ्यात पवना धरण क्षेत्रात एकूण 3874 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर आता पावसाने परतीचा प्रवास सुरु केल्यानंतरही धरण क्षेत्रात अवघा 1687 मिमी पाऊस पडला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात निम्म्यापेक्षादेखील कमी पाऊस पडल्यानंतरही योग्यप्रकारे पाणीसाठ्याचे नियोजन केल्याने जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा पुरणार आहे.
पाणीपुरवठा मात्र दिवसाआडच
पिंपरी-चिंचवड शहरातील दर माणसी पाणी वापराचे प्रमाण अधिक आहे. तर पवना धरणातून होणाऱ्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानादेखील शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याची लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. मात्र महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.