हभप प्रशांत महाराज मोरे देहुकर
जे बहुतां एकां अव्हांतरु । अहंकाराचा भूतसंचारु । जाहला म्हणौनि विसरु । आत्मबोधाचा ।।103।। ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढील अधोगतीची लाज नेणवे । आणि करिताति जें न करावें । वेदु म्हणे ।।104।। पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ।।105।। इंद्रियग्रामींचे राजबिदीं । अहंममतेचिया जल्पवादीं । विकारांतरांचि मांदीं । मेळवूनियां ।।106।। (अध्याय 7 वा) संत ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी परमात्म्याच्या भक्तीपासून वंचित राहणाऱ्या अभक्ताची लक्षणे प्रतिपादीत करतात. अशा लोकांमध्ये अहंकाररूपी भूताचा संचार झालेला असतो.
त्यामुळे त्यांना “मी ब्रह्म आहे’ या परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो. त्या विस्मृतीच्या काळात नियमरूपी वस्त्राची आठवण त्यांना राहात नाही. भविष्यातील अधोगतीची लाज त्यांना वाटत नाही आणि वेद जे कर्म करू नये म्हणतो, तेच कर्म ते करतात. हे लोक मनुष्य शरीर धारण करून मुक्ती आणि भक्ती करता इहलोकात आलेले असतात.
परंतु ते कर्तव्याचा पुरुषार्थाचा संपूर्ण भाग टाकून इंद्रिय रूपी गावाच्या राज-रस्त्यावर उभे राहून “देह मी आहे’ , “गृहपुत्रादी माझे आहे’ अशी वेडेपणाची बडबड करून, ते आपल्या भोवती काम-क्रोध अशा तत्सम विकारांचा समुदाय गोळा करतात.