सोने सोनेपणा उणे । न येताचि झाले लेणे । तेवि न वेचता जग होणे । अंगे जया ।।4।। मागील ओवीत सांगितलेली बहुभवनाची अर्थात जगद्भवनाची प्रक्रिया माऊली श्रीज्ञानोबाराय या ओवीतून सदृष्टांत स्पष्ट करतात.
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात, हे जगत् स्वभावतः झालं, की कोणी केलं, की भासलं या मूलभूत प्रश्नांच्या अनुषंगाने भारतीय तसेच पाश्चात्य सर्वच दर्शनकारांनी सोपपत्तिक सिद्धांत मांडले आहेत. ते “कार्यकारण सिद्धांत’ या उपनावाने प्रचलित आहेत.
येथे माऊली सांगतात, जसे सोन्याच्या लगडीपासून अलंकार बनविल्यानंतर मूळ सोन्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणविशेषात काहीही कमतरता न येता, ते अलंकाररूपात परिवर्तित होते.
तद्वत् परमात्म्यापासून संपूर्ण चराचरात्मक जगत निर्माण झाल्यानंतर परमात्म्याच्या मूळ निर्विकार, असंग स्वरूपात काहीही बाधा येत नाही. तसे पाहता व्यवहारात घटपटादि कार्याविष्कार होत
असताना मृत्तिकादि तत्कारणांच्या ठिकाणी व्ययादि विकार होताना दिसतात. परंतु परमात्म्यापासून जगनिर्मिती होताना मूळ परमात्म स्वरूपात कशाचीही तूट न येता, ते जसेच्या तसे अखंड वा परिपूर्ण राहते.,
– चांगदेवपासष्टी तत्त्वचिंतन (भाग – 5)