वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन । एक नारायण सार जप ।। जप तप कर्म हरीविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ।। हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ।। ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ।।
माऊली हरिपाठात म्हणतात, सर्वांचे सार एक नारायण आहे, त्याचा तू जप कर याविषयी श्रुतिस्मृती व शास्त्र यांचे वचन प्रमाण आहे. इतर जपतपादि कर्मे करण्याचे श्रम हरिभजनावाचून व्यर्थ जाणारे आहेत.
ज्याप्रमाणे भ्रमर मकरंद सेवन करण्याच्या भरात त्या कमलकलिकेत सापडला जातो म्हणजे त्याला बाहेर निघून येण्याची शुद्धी राहात नाही, त्याप्रमाणे हरीचे नामस्मरणात रत झालेला साधक हरिस्वरूपी एकमय होतो व त्याचे फिरून प्रपंच परावर्तन होत नाही.
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र आहे आणि शास्त्रही पण तेच आहे, त्याच्या दराऱ्याने यमाने आमचा कुलगोत्राचा त्याग केला आहे.