तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणौनि ।। 349 ।। येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन । म्हणौनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ।। 350।। अ. 9 वा
माऊली प्रस्तुत ओवींच्या माध्यमातून जे भक्त परमात्मा भगवंताची उपासना न करता इतर देवतांची उपासना करण्यात मग्न असतात अशा भक्तांविषयी विचारमंथन करतात. पक्वान्नातील रस मुखानेच सेवन केला पाहिजे. फुलातील सुगंध तर नाकाने घ्यावा लागतो.
त्याप्रमाणे इंद्रादी देव देवता माझी रूपे असली तरी मला इंद्र वगैरे न समजता मी समजूनच माझे भजन किंवा साधना करावी लागते. परंतु इतर जे कर्मठ आहेत ते माझी सर्व व्यापकता न जाणुन, जे काही भजन करतात, ते परिणामी वाया जाते.
कारण माझे भजन इतर देवतांच्या उद्देशाने होत असल्यामुळे, त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलते. म्हणून माझे भजन माझ्याच उद्देशाने होण्याचे ज्ञान हेच खरे कर्माचे डोळे आहेत. ते ज्ञानदेखील भ्रम, संशय आणि दोषरहित असावे लागते.