माजी मुख्यमंत्री विजय रूपानी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांची आणि तीन डझनहून अधिक आमदारांची तिकिटे भाजपने कापली आहेत आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, तेथे 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल येणार आहेत. भाजपकडून 25 टक्के तिकिटे नवीन चेहऱ्यांना देण्यात येतील व उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष असेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अगोदरच जाहीर केले होते. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवून देण्याबाबत शहा यांची ख्याती आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. पूर्वी पक्षांना मतांच्या विभागणीसाठी अपक्ष उमेदवार उभे करावे लागत. ही जागा आम आदमी पक्ष म्हणजे “आप’ने घेतली आहे. “आप’मुळे कॉंग्रेसच्या मतांमध्ये घसरण होईल व त्याचा भाजपला फायदा होईल, असा विश्वास शहा यांना वाटतो. गेल्या निवडणुकीत भाजपने पाच हजारांपेक्षा कमी फरकाने 35 जागा जिंकल्या होत्या. यावेळी “आप’च्या उपस्थितीने या जागांवर भाजपचे मताधिक्य वाढेल. भाजप आणि कॉंग्रेसमध्येच लढत होईल, असा सर्वसाधारण अंदाज आहे. या निवडणुकीत भाजप आणि आपमध्ये संगनमत झाले आहे, आपचे उमेदवार भाजप ठरवत आहे, तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या आपच्या नेत्यांनी गुजरातमध्ये पैशाच्या बॅगा पोहोचवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. गुजरातमधील वजनदार नेते इंद्रनील राजगुरू यांनी नुकताच “आप’ला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये वापसी केली. भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने आपण “आप’मध्ये प्रवेश केला. मजबूत स्थितीत असणाऱ्या “आप’च्या 15 नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. परंतु निवडणुकीत भाजपला मदत होईल, अशा पद्धतीने “आप’ने तिकीटवाटप केल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे आरोप-प्रत्यारोप होतात. परंतु गुजरातमधील कॉंग्रेसची स्थिती दयनीय असून, त्या नैराश्यातूनच “आप’वर आरोप करण्यात येत असल्याचे दिसते. कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपची स्थिती बरी या अर्थाने आहे, की त्या पक्षाच्या श्रेष्ठींचे संघटनात्मक बाबीत आणि निवडणूक व्यूहरचनेत पूर्ण लक्ष असते. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणेच याही वेळी अँटि-इनकम्बन्सीची लाट असल्याचे लक्षात घेऊन, पक्षाने भाकरी फिरवण्याचा प्रयोग केला आहे. माजी मुख्यमंत्री विजय रूपानी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांची आणि तीन डझनहून अधिक आमदारांची तिकिटे भाजपने कापली आहेत. कित्येक वर्षे सत्तेत राहिल्याने, पक्षात आलेले मांद्य घालवून गुजरातचा किल्ला आणखी भक्कम करण्याचा हेतू यामागे आहे. गुजरातच्या निवडणुका फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच लढवल्या जाणार आहेत.
वरिष्ठ नेत्यांची तिकिटे कापून, त्यांना वानप्रस्थाश्रमात जाण्याचाच संदेश देण्यात आला आहे. शिवाय आम्हाला स्वतःलाच निवडणूक लढवायची नाही आणि नवीन पिढीकडे सूत्रे सोपवायची आहेत, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांसमोर करण्यास त्यांना सांगण्यात आले होते. रूपानी, पटेल, भूपेंद्र चुडासामा हे साधारणतः सत्तरीतही पोहोचलेले नाहीत. गेल्या वर्षीदेखील भाजप नेतृत्वाने रूपानींसह संपूर्ण मंत्रिमंडळच बदलून टाकले होते. प्रथमच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवण्यात आले. माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मंत्र्यांना घरी पाठवूनही श्रेष्ठींना आत्मविश्वास वाटत नव्हता. म्हणून त्यांना तिकिटेच न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वास्तविक 66 वर्षांचे विजय रूपानी हे अतिशय साधे, लोकांत रमणारे आणि ऍप्रोचेबल नेते आहेत. अर्थात रूपानी यांच्या राजकोट या मतदारसंघातील पक्षकार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे. गेल्या वर्षी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, त्याच्या केवळ आदल्या रात्री त्यांना दिल्लीवरून आदेश आला होता. आपल्या हकालपट्टीची पूर्वसूचना त्यांना फक्त एक दिवस आधी मिळाली. तरीदेखील त्यांनी तत्काळ राजीनामा दिला. रूपानी हे 1987 साली राजकोट महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते राजकोटचे महापौर बनले व 2006 साली त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. भाजप प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता, गुजरात महापालिका वित्तमंडळाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. 2016 साली रूपानी गुजरात भाजपचे अध्यक्ष बनले आणि 2017 साली त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा पाटीदार आंदोलनामुळे भाजपविरोधी लाट निर्माण झाली होती. परिणामी, आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले, तेव्हापासून नितीन पटेल हे आज ना उद्या आपण मुख्यमंत्री होऊ अशी इच्छा बाळगून होते. किमान रूपानी यांच्या हकालपट्टीनंतर तरी मुख्यमंत्रिपद मिळण्याऐवजी, त्यांचे उपमुख्यमंत्रिपदही गेले. 66 वर्षीय नितीन पटेल हे कडवा पाटीदार समाजाचे बडे नेते आहेत. ते मेहसाणा जिल्ह्यातील असून, मोदी, शहा, आनंदीबेन पटेल हे मूळ याच जिल्ह्यातील आहेत. राज्य सरकारमध्ये अर्थ, रस्ते, नगरविकास, नर्मदा अशी सर्व महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. कोविड काळात नितीन पटेल हे आरोग्यखात्याची जबाबदारी सांभाळत होते. 1977 सालापासून ते भाजपात आहेत. पटेल हे प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले आणि आमदार म्हणून त्यांनी सहावेळा विजय प्राप्त केला. शंकरसिंह वाघेला यांनी 1995 मध्ये भाजपमधून बंडखोरी केली, तेव्हा भाजपची साथ न सोडणारे, आपली निष्ठा दाखवणारे नितीन पटेल हे नेते होते.
आनंदीबेन यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले, तेव्हा त्यांनी पटेल यांचे नाव सुचवले होते; परंतु शहा यांनी रूपानी यांची निवड केली. रूपानी व पटेल यांचे फारसे जमत नव्हते. 2017 मध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर, पटेल यांच्याकडील महत्त्वाची खातीही काढून घेण्यात आली. मात्र, भाजपमध्ये पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो आणि बंडखोरी वगैरे करण्याच्या भानगडीत फारसे कोणी पडत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.