प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशप्रेमी नागरिकांनी जीवनातील आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट आणि सर्जनशील काम करणे ही खरी देशभक्ती असल्याचे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) स्थापना दिनानिमित्त बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) आयोजित कार्यक्रमात धर्माधिकारी बोलत होते. यावेळी महाविद्यालय स्थानिक विकास समितीचे अध्यक्ष सागर फडके, डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर आदी उपस्थित होते. गेल्या शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीयत्व, एकात्मता, लोकशाही आणि राज्यघटना बळकट होत गेली. गाव वस्तीवर त्याची पाळेमुळे घट्ट झाली. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने मोठी प्रगती केली. एकाही क्षेत्रात भारत मागे नाही. शास्त्रज्ञांनी देशाची शान वाढवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही मोठी उपलब्धी आहे, असे अविनाश धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
स्मृती पटवर्धन यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. जगदीश लांजेकर यांनी अहवाल वाचन केले. प्रास्ताविक डॉ. सीमा पुरोहित यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रूपाली देशपांडे यांनी केले. आभार वसंत धिवार यांनी मानले.