प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – शिवाजीनगर येथील भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेच्या वतीने डॉ. नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी सीमेवरील जवानांसाठी सुमारे 46 हजार राख्या नुकत्याच पाठवल्या. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड, पुणे, अकोला, विदर्भ, मुंबई अशा अनेक शहरांतून या राख्या जमा झाल्या.
अनेक विद्यार्थ्यांनी राख्यांबरोबर पत्रे, फोन नंबर दिल्याने अनेकांना प्रत्येक वर्षी सैनिकांचे फोन येत असल्याचा अनुभव आहे. या उपक्रमात पं. दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेने 10700, समस्त हिंदू आघाडीच्या मातृशक्ती संघटनेने 4 हजार राख्या संकलित केल्या. या कार्यात मॉडर्न हायस्कूलचे शिवाजी अंबिके, तर बापूसाहेब पवार कन्या विद्यालयातील तृप्ती निघोजकर यांनी सहकार्य केले.
या उपक्रमात सुरुवातीला 2011 साली 500 राख्या जमा झाल्या होत्या, असे एकबोटे यांनी सांगितले. कारगिल येथे 2011 साली गेलो असता वीर जवान सौरभ कालिया यांच्या बलिदानापासून, सैनिकांना राख्या पाठवण्याची प्रेरणा मिळाल्याचे एकबोटे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी समृद्धी एकबोटे, डॉ. वैष्णवी एकबोटे, डॉ. ऋग्वेदी एकबोटे यांनी सहकार्य केले.