पुणे – टिंबर मार्केटला आग लागल्याची घटना ताजी असतानाच; सोमवारी पुन्हा 4 घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वर्दळीच्या आणि अरुंद बाजारपेठा असलेल्या भागांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
याबाबत मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दाटवस्ती तसेच वर्दळीच्या दाट भागांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट करून घेतले जाणार आहे. मात्र, शहराची वाढ होतानाच टिंबर मार्केटसारख्या मोठ्या बाजारपेठा आता नव्याने होत असलेल्या रिंगरोडलगत वसवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असे धोके टळतील.
या शिवाय जड वाहनांची वर्दळ तेथून सहजपणे होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे होलसेल मार्केट शहराबाहेर उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अशा मार्केटसाठी जागांची यादी करण्यात येत असून, त्यानुसार टिंबर मार्केटसह इतर मार्केट शहराबाहेर नेता येतील का, याचा आराखडा तयार केला जाणार आहे. मात्र त्यास वेळ लागणार असल्याने तातडीची बाब म्हणून अशा वर्दळीच्या भागांचे फायर ऑडिट करून सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत.’