– नवनाथ बोरकर (प्रतिनिधी)
Gram Panchayat Election : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी जय हनुमान पॅनलच्या सुप्रिया मनोज नाळे यांनी मोठे मताधिक्य घेत विजय संपादन केला आहे. यामध्ये जय हनुमान पॅनलने १५ पैकी ८ जागा जिंकत डोर्लेवाडी ग्रामपंचायतवर सत्ता कायम ठेवली आहे. विरोधी असलेल्या जय भवानी माता पॅनलला सात जागेवर विजय मिळवता आला.
डोर्लेवाडी (बारामती) ग्रामपंचायतचा कारभार आता महिलेच्या हाती आला आहे. या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण पडलेले होते यामध्ये जय हनुमान पॅनलच्या सरपंच पदासाठी सुप्रिया मनोज नाळे, जय भवानी माता पॅनलच्या ज्योती अतुल भोपळे,अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलच्या रोहिणी हरिभाऊ आटोळे, आणि अपक्ष प्रभावती कांतीलाल नाळे यांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवलेली होती यामध्ये सुप्रिया मनोज नाळे यांनी बाजी मारली आहे.
त्यांनी सर्वाधिक प्रथम क्रमांकाची १९१४ मते मिळवत विजयी संपादन केला. दुसऱ्या स्थानी ज्योती अतुल भोपळे यांना १५३१ मते मिळाली तर तिसऱ्या स्थानी रोहिणी हरिभाऊ आटोळे यांना १००६ मते मिळाली आणि चौथ्या स्थानी प्रभावती कांतीलाल नाळे यांना अवघी १६७ मते मिळाली. सुप्रिया मनोज नाळे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना सरपंच पदी निवडून आल्याचे घोषित केले.
डोर्लेवाडी मध्ये दरवेळेस जय हनुमान पॅनल आणि जय भवानी माता पॅनल मध्ये सरळ लढत पहायला मिळायची. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलने अल्पसंख्यांक मतदाराची मोट बांधत सरपंच पदासह काही वार्ड मध्ये सदस्य उभे केल्याने या ठिकाणी दोन्ही पॅनल समोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलला प्रचार यंत्रणा राबवताना दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ८२ टक्के मतदान झाल्यामुळे नेमकं कोण विजय होणार याची धाकधूक सर्वांनाच लागून राहिली होती. यात जय भवानी माता पॅनलचे तीन तर हनुमान पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
उर्वरित दहा जागेसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यामध्ये जय हनुमान पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुप्रिया मनोज नाळे यांना १९१४ मध्ये मिळाली तर विरोधी जय भवानी माता पॅनलच्या उमेदवार ज्योती अतुल भोपळे यांना १५३१ मते मिळाली.
तर स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलच्या उमेदवार रोहिणी हरिभाऊ आटोळे यांना १००६ मते मिळाली तर अपक्ष प्रभावती कांतीलाल नाळे यांना फक्त १६७ मते मिळाली.
सत्ताधारी जय हनुमान पॅनलचे विजयी उमेदवार – छबुबाई हनुमंत मदने, विश्वजीत भारत घोडे, राणी निरंजन नेवसे, रेखा माणिक नाळे, विद्या सचिन काळकुटे, राहुल सुरेश भोपळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- सुमित्रा अजित वामन, सुनिल मारुती म्हेत्रे
विरोधी जय भवानीमाता पॅनलचे विजयी उमेदवार- सचिन चंद्रकांत निलाखे, सोनाली दिलीप नवले, प्रशांत बळीराम जाधव, संदीप पांडुरंग कुदळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- बीबी शामराव शिंदे, सोनाली अमोल शिंदे, राजेंद्र दुर्गा शिंदे
आदर्श सरपंचाचा दारून पराभव…
डोर्लेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत जय हनुमान पॅनलचे पांडुरंग सलवदे हे तब्बल ८७० मतांच्या फरकाने थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आले होते. पाच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेसह विविध ५ खासगी संस्थांचे आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले होते.
यावर्षी इतर नव्या उमेदवारांना संधी देता यावी म्हणून पॅनलने मागणी असतानाही त्यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र तरीही सलवदे हे सदस्यपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. शेवटी ज्या जनतेनी निवडून दिले त्याच जनतेनी यावेळी मात्र त्यांचा दारुण पराभव केला. सलवदे यांना केवळ १६८ मतांवर समाधान मानावे लागले.या पराभवाची चर्चा सर्व तालुक्यात होती.
स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलची कडवी झुंज…
डोर्लेवाडी येथील निवडणुकीतील सरपंचपदाच्या उमेदवार रोहिणी हरिभाऊ आटोळे यांनी मागील ३ वर्ष गावात मोठ्या प्रमाणात सामजिक कार्यात सहभाग घेऊन विविध उपक्रम राबविले होते. अनेक शाळा व संस्थांना सामजिक भावनेतून मदत केली होती.
त्यांनी गावातील कोणाचेही राजकीय पाठबळ नसताना स्वाभिमानी अल्पसंख्यांक संघटनेच्या जनसेवा पॅनलच्या माध्यमातून या पारंपारिक दोन्ही पॅनलपुढे फार मोठे आव्हान उभे केले होते.
दोन्ही पॅनलनी या उमेदवाराचा धसका घेतला होता. त्यानुसार फार मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण झाले काही ठिकाणी मतदारांना दमबाजी देखील करण्यात आली. मात्र तरीही या उमेदवाराने तब्बल १००६ मते मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.