पुणे – राज्यातील जमिनीची फेरमोजणी करताना भूमि अभिलेख विभागाच्या वतीने “गगन’ या उपग्रहाच्या मदतीने जमिनीचे अक्षांश आणि रेखांश (कोऑर्डिनेट्स) निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यात प्रत्येक सर्व्हेनंबरची हद्दीवर जीपीएस स्टोन बसवण्यात येणार असून त्यांच्या मदतीने जमिनीची मोजणी सहज शक्य होणार आहे.
राज्यातील जमिनीची फेरमोजणी करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. 100 वर्षांनंतर प्रथमच जमिनीची मोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा महसूल विभागांतील प्रत्येक एका जिल्ह्याची यामध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि रायगड यांची निवड झाली आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.