प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात साहित्य निर्मितीसाठी उत्तम वातावरण देखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
प्राचार्य संजय चाकणे लिखित “चाकोरी बाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाच्या प्रकाशन राजभवन येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.
पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणामुळे शिष्यांना भ्रमण करावे लागत असल्याने त्यांना जीवनाचे अनुभव मिळायचे, समाजाविषयी आकलन व्हायचे. विद्यार्थ्यांना अनुभवसिद्ध करणारे असे शिक्षण आवश्यक आहे. विद्यापीठातून सिद्धांत शिकल्यानंतर समाजात मिळणारे व्यावहारिक ज्ञानही महत्वाचे आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून चार भिंतीच्या बाहेरील जगातील शिक्षणाचा चांगला परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्य होत असून आदिवासी बांधवांनी बनविलेल्या बांबूच्या राख्यांची एनएसएसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे राज्यपाल म्हणाले.
कुलगुरू डॉ. काळे, राजेश पांडे आणि गोयल यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. चाकणे यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली.