पाबळ -जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाबळ व परिसरासाठी आठ टॅंकर मंजूर केल्याचे पत्र 1 एप्रिल रोजी व्हायरल झाले. तेव्हापासून टॅंकर कधी येणार अशी विचारणा पाबळचे ग्रामस्थ करीत होते. शेवटी शासकीय टॅंकरची प्रतिक्षा करीत येथील सरपंच शेळके यांनी स्वःखर्चाने टॅंकरने गावठाणात पाणी वाटप सुरू केले आहे.
दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारीत पाणीपुरवठा करणारा थिटेवाडी बंधारा यंदाही कोरडा ठाक पडला आहे. तेव्हापासूनच दरवर्षी प्रमाणे पाणी टंचाई सुरू होते. दरवर्षी टॅंकरने पाणीपुरवठा ही बाबही नित्याची आहे. याहीवर्षी मागील अनुभवाप्रमाणे ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिला. टॅंकरही मंजूर झाले. गटविकास अधिकारी कार्यालयाला व्यवस्थेसाठी आदेशही झाले मात्र दररोज उद्या टॅंकर येतील अशी उत्तरेही दरवर्षीप्रमाणे मिळत आहेत.
दरम्यान पूर्वीची नळयोजना डबघाईला आल्याची बाब सहन करूनही ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर गोरगरीब कुटुंबे सायकलवरून पाणी वाहत घाम गाळत आहेत. तर ज्यांची पाणी वाहून नेण्याची परिस्थिती नाही अशा लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे, अशा परिस्थिती पिण्याचे फिल्टर पाणीही ही विकत आणि वापराचे पाणीही विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
खर्चामुळे नागरिक अडचणीत
सध्या पाबळ परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थ शासकीय टॅंकरची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे मात्र हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पाणी वितरणाचे काम व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. दरम्यान खासगी टॅंकर वाहतुकदारांनी दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ होऊ घातलेल्या खर्चामुळे अडचणीत आले आहेत.