नवी दिल्ली – केंद्र सरकारने सर्वच बाजूने लोकशाहींचा गळा घोटला आहे. आणि त्यांनी विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी व्यापक स्तरावर रचना केली आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
विरोधी पक्षांच्या सदस्यांना क्षुल्लक कारणासाठी निलंबीत केले गेले आहे. या सदस्यांनी सरकारला प्रश्न विचारल्यानेच त्यांच्यावर अशी कारवाई केली गेली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मुद्दाम आणि वारंवार गैरवर्तन केल्याचे कारण दाखवून अधिर रंजन चौधरी यांनाही लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी गरज पडल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना चौधरी म्हणाले की, मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान संसदेत बोलतील याची खात्री करण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. आमच्याकडे हा एकमेव शेवटचा पर्याय होता.
पण अविश्वासावरील चर्चा प्रलंबित असताना त्यांनी (भाजप) संसदेत विधेयके मंजूर करणे सुरू ठेवले. अनेक विधेयकांवर विरोधकांना आपले मत मांडण्याची संधी मिळाली नाही,असा आरोपही त्यांनी केला.
आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेराही उपस्थित होते. मोदीजींचा इंडिया या शब्दाला विरोध का आहे?असा सवाल चौधरी यांनी केला. ते म्हणाले की, इंडिया आणि भारत यात काही फरक नाही.