नवी दिल्ली – मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या टर्ममध्येच स्वच्छ भारत मोहीम राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. आता केंद्र सरकारने स्वच्छचा मोहीम राबवली असून जवळपास 6,154 कार्यालयांची स्वच्छता केली. त्यातून जमा झालेल्या रद्दीच्या विक्रीतून केंद्राला तब्बल 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच यामुळे व्यापलेली 12.01 लाख चौरस फूट जागाही मोकळी झाली आहे.
एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही लोकसभेत ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रालये, विभागांमध्ये आणि त्यांच्या संलग्न कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवर स्वच्छतेचे भान यावे यासाठी केंद्र सरकारने 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पहिली विशेष स्वच्छता मोहीम राबविली होती. या मोहिमेत केंद्र सरकारच्या 6154 हून अधिक कार्यालयांनी भाग घेतला.
केंद्र सरकारच्या या 6154 कार्यालयांमधील सुमारे 12.01 लाख चौरस फूट जागा रिकामी करून स्वच्छ करण्यात आली. महिनाभर चाललेल्या या मोहिमेदरम्यान रद्दी आणि भंगार सामानाची विल्हेवाट लावून 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळवल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
मोकळ्या झालेल्या जागेत आता ग्रंथालय –
केंद्र सरकारने रद्दी विकून मोकळी केलेली ही 12.01 चौरस फूट जागा आता विविध कामांसाठी उपयोगी आणण्यात आली आहे. या जागा आता उपाहार गृह, ग्रंथालये, परिषद, बैठकांसाठी सभागृह, निरामय केंद्रे आणि पार्किंग अशा विविध कारणांसाठी उपयोगी आणण्यात येत आहेत, अशी माहितीही केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत दिली.