नवी दिल्ली : व्हॉट्सऍपवर पाळत ठेवण्याच्या मुद्यावरून देशात विरोधकांनी रान उठवले आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारकडून आपला फोनदेखील टॅप होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. सरकारच्या या कारवाईमुळे आपण फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नसल्याचेही यावेळी बॅनर्जी यांनी म्हटले.
माझा फोन टॅप केला गेला आहे, कारण मला माहित आहे आणि माझ्याकडे पुरावे आहेत. हे सरकारकडून माझा फोन टॅप होत असल्याचे सरकारलादेखील माहिती आहे. केंद्र सरकार आणि दोन-तीन राज्य सरकारांच्या आदेशानुसार हे घडत आहे. मी राज्यांची नावे घेणार नाही पण एका राज्यात भाजपाचे राज्य असल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी यावेळी ‘आमच्या बोलण्याचे स्वातंत्र्य कोठे आहे? आज आपण कोणत्या स्वातंत्र्यात राहत आहोत हे आपण फोनवरही बोलू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. आता काहीही सुरक्षित नाही, व्हॉट्सऍपवरही आपण बोलू शकत नाही. पूर्वी, आम्हाला वाटले की व्हॉट्सऍपची हेरगिरी करता येणार नाही. पण, आता व्हॉट्सऍपलाही सोडण्यात आले नाही. कोणताही लॅंडलाईन फोन किंवा मोबाइल फोन सुरक्षित नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचवेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की व्हाट्सएपने इस्त्रायली स्पायवेअर पेगाससद्वारे हेरगिरी करण्यास कबूल केले की केंद्राने याची चौकशी केली पाहिजे. हेरगिरी वादात केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत ममता यांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत त्यांना पूर्ण माहिती असल्याचे म्हटले आहे.
ममता यांनी या प्रकरणाला अतिशय गंभीर म्हटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.