मुंबई – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीकडून याचा जोरदार निषेध करण्यात आला. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलने केली. या मुद्द्यावर अजित पवार गट आक्रमक झाला असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे.”
नेमकं गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?
“अजित पवार यांची भावना धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलेआहे,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते.