पुणे – शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यापाठोपाठ पानेशत धरणही 50 टक्के भरले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून 12.85 टीएमसी म्हणजे 44.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
मे अखेरीस खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांनी तळ गाठला होता. यात अवघा सव्वा दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यानंतर जूनमध्ये पाऊस झालाच नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणपरिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. मागील काही दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे दरवाजे उघडून त्याद्वारे मुठानदीत 4 हजार 200 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी धरणक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्ग बंद करण्यात आला.
1.97 खडकवासला
5.23 पानशेत
4.83 वरसगाव
0.82 टेमघर