मुंबई – नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात(डीए) 4 टक्के वाढ करण्यात आली, ज्यामुळे आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांवर जाणार आहे. 1 जुलै 2022 पासून हा नवा महागाई भत्ता लागून होणार आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतचा थकीत महागाई भत्ता देखील जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला, पण राज्य कर्मचाऱ्यांना अजून 34 टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत होता. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार डीए वाढीची मागणी केली जात होती. त्यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात ओ पी एस योजना आणि महागाई भत्ता वाढीबाबत राज्य शासन निर्णय घेईल अशी आशा होती. पण यावर अधिवेशनात चर्चाही झाली नाही. राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना अर्थातच ओपीएस लागू करण्यासाठी राज्य शासन अक्षम असल्याचे सांगितले होते.
यावाढीनुसार गट “अ’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 ते 40 हजार रुपयांची तर गट “ब’ कर्मचाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांची वाढ मिळू शकते. गट “क’ श्रेणीसाठी सुमारे 10 ते 15 हजार रुपयांची भाडेवाढ असेल तर त्याखालील गटांसाठी 8 ते 10 हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे.