मुंबई – गेल्या दीड वर्षात करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. आगामी काही काळ अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता जागतिक सुवर्ण परिषदेने च्या यासंबंधातील अहवालात व्यक्त कली आहे.
नागरिकांच्या उत्पन्नावर आणि रोजगारावर परिणाम झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीला ग्राहक फारसा प्राधान्यक्रम देण्याची शक्यता काही. मात्र ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा होती मात्र खरेदी करण्यासारखी परिस्थिती नव्हती असे ग्राहक पुढे येऊन उत्सवाच्या काळात तरी खरेदी करण्याची शक्यता आहे. सोन्याची आयात वाढत आहे.
याचा अर्थ काही प्रमाणात भारतीय ग्राहक सोने खरेदी करण्याची शक्यता आयातदरांना वाटत आहे. जर आगामी काळात करोनाचा आणखी काही प्रश्न निर्माण झाला नाही तर दीर्घ पल्ल्यात भारतातील परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये सोन्याचा बराच व्यवहार अनौपचारीक क्षेत्रात येतो. या क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षापासून नेटाने प्रयत्न करीत आहे. जर या क्षेत्रात पारदर्शकता आली आणि जागतिक दर्जाचे स्टॅंडर्डायझेशन आले तर दीर्घ पल्ल्यात भारतीय ग्राहक आणि व्यापाऱ्यासाठी परिस्थिती अधिक चांगली होईल.
भारतामध्ये नागरिकांचे उत्पन्न वाढले तर आपोआपच सोन्याची मागणी वाढते असे अभ्यासात आढळून आले आहे. करोनामुळे गेल्या दीड वर्षांमध्ये नागरिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आगामी काळामध्ये परिस्थिती वेगाने सुधारण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी नागरिक आगामी काळामध्ये इतर माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्याची शक्यताही वाढत आहे. त्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बॅंक बरेच पर्याय उपलब्ध करून देत आहे. सोन्याच्या किमती कमी असतील, पाऊस चांगला पडला असेल आणि कर कमी असतील तर सोन्याची मागणी भारतात लघु पल्ल्यात वाढते. मात्र नागरिकांचे उत्पन्न वाढण्याची शास्वती निर्माण झाल्यानंतर दीर्घ पल्ल्यात सोन्याची मागणी वाढते असे जागतिक सुवर्ण परिषदेनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले.