मुंबई – देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात सहा वेळा नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस म्हणजे त्यांना बजावलेले समन्स नव्हे. त्यांना प्रश्नावलीही पाठवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब घेतला. यात कोणताही राजकीय अभिनवेश नाही. तपासाचा हा नियमित भाग होता, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली
मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात होत असलेले आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते करत असलेले आरोप आणि राज्याच्या पोलीस दलाची भूमिका या संदर्भात त्यांनी माहिती दिली.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे 26 मार्च 2021 रोजी दाखल झाला होता. अज्ञात व्यक्तीने राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गोपनीय माहिती प्राप्त केली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. भारतीय टेलिग्राफ कायदा, गोपनियता कायदा याअतंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा नोटीस बजावण्यात आली. नोटीस म्हणजे समन्स नव्हे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणती माहिती द्यायची कोणती नाही हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी फडणवीस यांना नोटीस पाठवली होती त्यावेळी त्यांना प्रश्नावली पाठवली होती. प्रश्नावलीची उत्तरे त्यांनी दिली नव्हती. त्यामुळे आज पोलीस त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेत आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
फडणवीस यांनी मला विशेषाधिकार आहेत, असे सांगितले आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, विरोधी पक्ष नेत्याला असे काही विशेषाधिकार माझ्या माहितीप्रमाणे नसतात. पण माझ्या माहितीत काही त्रुटी असतील तर मी माहिती घेऊन त्या दूर करेन.