श्रीगोंदा – बाजार समितीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतांना शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अतुल लोखंडे यांनी केले. बाजार समिती सभापतीपदाचा पदभार लोखंडे यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
“बाजार समितीचा आत्मा असलेल्या काष्टी, चिंभळा या उपबाजार समितीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार तसेच प्रतीक्षेत असलेल्या कोळगाव, देवदैठण, मांडवगण, घोगरगाव या नवीन उपबाजार समितीचे काम लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध करणार आहे” असे लोखंडे म्हणाले.
द्राक्ष, लिंबू, कांदा, डाळिंब, कापूस, मका यासारख्या सर्व मालाला हक्काची बाजारपेठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे पणन करण्याचे काम प्राधान्याने करणार असेही ते म्हणाले.
यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, बाबासाहेब इथापे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुभाष काळाणे, उपाध्यक्ष शरद जमदाडे, कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार आदी उपस्थित होते.