मुंबई – दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मराठी भाषा गौरव वर्षभरच नव्हे तर आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. त्यांच्या कर्तृत्वाचा थोडा तरी अंश आपल्यात आला पाहिजे. आपल्या साधू-संतांनी आपल्याला दिलेला वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाची मातृभाषा ही त्याच्या आईकडून त्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी असते. तिचा गौरव करणे आवश्यक आहे.
शिवसेनेची सुरुवात झाली तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मराठी भाषिकांना सांगितले होते “नोकऱ्या मागणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा’ असे सांगून व्यवसाय करण्याचे आवाहन मराठी युवकांना त्यांनी केले होते. मराठी भाषा यापुढे वर्षानुवर्षे टिकली पाहिजे याची जबाबदारी आपल्यावर आहे. घरा-घरांतून मराठी बोलली गेली पाहिजे. इतर भाषा शिकाव्यात मात्र मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.