मुंबई -रोहित शर्मा व विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांसाठी ताजेतवाने ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या काळात टी-20 संघात आयपीएल स्पर्धेतील नवोदितांना जास्तीत जास्त संधी देणे गरजेचे आहे, असे मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय संघ जून महिन्यात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. तसेच त्यानंतर आशिया करंडक व त्यानंतर एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा खेळणार आहे. त्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या संघातील वरिष्ठ खेळाडूंना ताजेतवाने ठेवणे आवश्यक आहे.
त्यांना जर या मोठ्या स्पर्धांबरोबरच साधारण मालिकांमध्ये तसेच टी-20 मालिकांमध्येही खेळवले गेले तर ते थकतील व त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होणार नाही, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.
तिलक वर्मा, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल व जीतेश शर्मा यांचा पुढील काळात टी-20 संघासाठी विचार केला जावा. त्यांना अनुभव मिळेल व त्यांच्यातूनच एकदिवसीय संघासाठी सरस खेळाडू मिळतील, असा विश्वासही शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.