गल्लीपासून दिल्लीपर्यंत जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेची नेहमी चर्चा होत असते. पण जीडीपी नक्की असते तरी काय, याचा अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो, जीडीपी आणि अर्थव्यवस्था यांच्यामुळे शेअर बाजाराच्या गतीवर व वाढीवर थेट परिणाम होतो का?
जीडीपी आणि अर्थव्यवस्थेचा शेअर बाजारावर होणारा परिणाम (भाग-१)
भारतात कॉन्सन्टट प्राईस अर्थात कायमस्वरुपी दरांच्या गणनेसाठी २०११-१२ हे वर्ष प्रमाण मानण्यात आले आहे. उदाहरणार्थ २०११ मध्ये शंभर रुपये किंमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या असतील तर एकूण जीडीपी ३०० रुपयांची आहे. २०१७ पर्यंत उत्पादन तीन वरून दोन वर आले मात्र वस्तुची किंमत शंभर रुपयांवरून दीडशे रुपये झाली तरी नॉमिनल जीडीपी ३०० रुपयेच राहिल. मात्र यातून प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली आहे का? अशावेळी प्रमाण वर्षाचे सूत्र कामी येते.
२०११ या प्रमाण वर्षानुसार कॉन्सटन्ट किंमत १०० रुपये याप्रमाणे जीडीपी २०० रुपयेच होतो. अशावेळी जीडीपीच्या दरात घट झाली आहे असे स्पष्ट म्हणता येईल.
देशातील उत्पादन व सेवांसंदर्भात आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी संस्था गोळा करते. यासाठी ही संस्था विविध निर्देशांकांवर नजर ठेवून असते. यामध्ये औद्योगिक उत्पादन आणि ग्राहक किंमत निर्देशांकाचा समावेश असतो. विविध केंद्रीय व राज्यातील संस्थांचे आकडे एकत्र करण्याचे काम केंद्रीय सांख्यिकी संस्था करत असते. घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी उत्पादन आणि कृषी क्षेत्राचे आकडे ग्राहक मंत्रायलातर्फे गोळा केले जातात. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विभाग औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची माहिती जमा करतात.
केंद्रीय सांख्यिकी संस्था ही सगळी माहिती एकत्रित करून जीडीपीचे आकडे जाहीर करते. प्रामुख्याने आठ औद्योगिक क्षेत्रांचे आकडे जमा केले जातात. कृषी, खनन, उत्पादन, वीज, बांधकाम, व्यापार, संरक्षण आणि अन्य सेवा अशा पद्धतीने तपशील गोळा केला जातो. जगातील प्रमुख दहा देशांची जीडीपी पुढीलप्रमाणे आहे.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारताचा जीडीपी २०१८-१९ या वर्षात ७.३० टक्के आणि २०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी ७.५० टक्के दराने वाढणार आहे. यामुळे भारतीय ग्राहक बाजारात मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची मागणी निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. याचाच अर्थ असा होतो की, येणाऱ्या तीन वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करणार आहे आणि याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या वृद्धीसाठी होणार आहे. जर आजही गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात व म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असतील तर त्यांना येणाऱ्या काळात चांगला परतावा निश्चितच मिळणार आहे.