राजगुरूनगर, (प्रतिनिधी)- राजगुरूनगर नगर परिषदेच्या वतीने ओला कचरा, सुका कचरा असे वर्गीकरण करून कचरा गोळा केला जातो. शहरातील सार्वजनिक ठिकाणे दररोज स्वच्छ केली जातातय मात्र काही बेशिस्त नागरिकांकडून राजगुरूनगर शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सध्या शहरात सर्रास वाढले आहेत. नगरपरिषदेने याबाबत कडक भूमिका घेणे आवश्यक असून त्यावर निर्बंध घातले पाहिजेत.
राजगुरूनगर शहर ही तालुक्याची राजधानी आहे. या राजधानीत सर्व विभागाची कार्यालये आहेत. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे. अनेक मोठी दुकाने आहेत. त्यामुळे शहरात जवळपास सर्वच रस्ते आणि सार्वजनिक परिसर दररोज गर्दीने गजबजलेला असतो. नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक कर्मचार्यांकडून सर्वच भाग स्वच्छ केला जातो. असे असताना शहरातील काही नागरिक घरातील ओला-सुका कचरा शहरातील रस्त्यांच्या कडेला, ओढ्यामध्ये, भीमा नदीवरील पुलांवरून खाली टाकला जातो. अत्यंत बेफिकीर पणे शहरातील काही नागरिक वागत असल्याने शहराच्या सौंदर्यावर गदा आणतात. तर दुसरीकडे राजगुरुनगर शहरातील कचरा टाकण्यासाठी जागेचा प्रश्न सुटत नसल्याने या समस्येला वर्षानुवर्षे नागरिकांना व नगर परिषद प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे.
राजगुरूनगर शहरातील मोकळ्या आणि सार्वजनिक रिकाम्या जागेत, रस्त्याच्या कडेला तसेच ओढ्यालगत कचर्याचे ढीग हमखास दिसून येतात. हा कचरा उचलण्यात येत नसल्याने जवळपास राहणार्या नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. राजगुरुनगर हे अत्यंत सुंदर शहर असून, रहदारीसाठी नागरिकांची मोठी पसंती आहे; मात्र शहरात पाणी रस्ते, गटार कचरा यांच्या समस्येमुळे शहराचा विकास रखडला आहे. शहरात गल्लीबोळात रस्त्यांची कामे सुरु आहेत; मात्र संबंधित ठेकेदारांकडून ती अपूर्ण ठेवली जात आहेत. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा गाडी जात नसल्याने नागरिक हा कचरा जाता येता रस्त्याच्या कडेला नदीच्या कडेला पुलावरून खाली टाकतात. अनेक जण रिकाम्या सार्वजनिक, खासगी जागेत गुपचूप कचरा टाकून देतात. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरलेली असते.
रस्ते खोदाईत जलवाहिन्या फुटल्या
शहरात सुरु असलेल्या रस्ता काँक्रीटच्या कामामुळे अनेक ठिकाणी खोदाई झाली आहे. रस्ता करताना खोदाई केल्याने जलवाहिन्या तुटल्या आहेत. नवीन योजना करण्यासाठी टाकलेल्या पाइपचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यात खोदाई झाल्याने त्या परिसरातील नागरिकांना पाणी जात नाही. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेक कुटुंबे नगर परिषदेकडे पाण्याबाबत विचारणा करतात मात्र त्यांची ससेहोलपट केली जात आहे. अगोदरच शहरात कमी दाबाने आणि काही तासच पाणी सोडले जाते त्यात रस्त्यात खोदाई झाल्याने जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.
15 घंटागाड्या 40 कर्मचरी तरीही…
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषद बरोबर अनेक स्वयंसेवी संस्था, शहरातील नागरिक पुढे सरसावले होते. मात्र नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे आणि नगर परिषदेच्या अधिकार्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या स्वछता मोहिमेला खीळ बसली आहे. नगर प्रशासनाची शहर विकास प्रति असलेली उदासीनता व राजगुरु नगर वासियांची संयमता या कारणाने राजगुरुनगर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत. नागरिकही शोषिक बनल्याने सर्वच कामे संथ गतीने होते आहेत. त्यामुळे कामे करणार्या ठेकेदारांना सुगीचे दिवस आले आहेत.
राजगुरूनगर नगर परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील कचरा उचलण्या साठी पंधरा घंटागाड्या कार्यरत आहे. तीस ते चाळीस आरोग्य कर्मचारी या कामासाठी कार्यरत आहे. तरीही कचरा आहे तिथे दिसून येतो. शहरातील काही ठिकाणी खासगी जागेचे कारणे पुढे करून आरोग्य कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याने कचर्याचे ढीग साचत आहे. तेथे राहणार्या नागरिकांकडून नगर परिषद सरसकट कर आकारून सुविधा देण्यास का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे..
चार वर्षांपासून कारभारीच नाही
राजगुरुनगर नगरपरिषद ला गेली चार वर्षापासून गांव कारभारी नाही काही काळ प्रशासक तर काही काळ मुख्याधिकारी प्रशासक म्हणून राजगुरूनगर नगर परिषदेचा कारभार चालवित आहे. नगरसेवक नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न, समस्या मांडण्यासाठी नगर परिषदेत अधिकार्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातही त्यांचे समाधान होत नाही.
नागरिकांनी केलेल्या सूचना व लेखी तक्रारींकडे दुर्लक्ष करीत केराची टोपली दाखविली जाते. राजगुरूनगर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे शहर आणि परिसरात मोठं मोठे ग्रह प्रकल्प उभे राहिले आहे. या मधील बेकायदा आणी वाढीव बांधकामाची नोंद शंभर टक्के नगरपरिषद दप्तरी असेल असे नाही. त्यामुळेच येथील नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे नगर परिषद असमर्थ ठरत आहे. सर्वेक्षणाच्या नावाखाली निर्णय होत नसल्याने शहरात बकालपणा वाढीस लागला आहे.