मंचर -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गावाला पाणी पुरवठा करणारा मोरदरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे; परंतु वीज पडल्याने विहिरीजवळचा ट्रान्सफॉर्मर जळाला, त्यामुळे ऐन पावसाळ्यात नळाला पाणी न आल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पावसाचे पडणारे पाणी बॅरलमध्ये भरून नागरिक आपली पाण्याची गरज भागवत आहेत.
अवसरी खुर्द गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून गेल्या 10 वर्षात दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे; परंतु वारंवार पाइपलाइन गळणे, विद्युत मोटारी जळणे, पाण्याच्या अनियमित वेळा, टाकीतून पाण्याची गळती होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे इत्यादी वारंवार होणाऱ्या त्रासामुळे गावातील रहिवासी वैतागले आहेत. येथील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने दखल घेण्याचीस गरज आहे.
येथील ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतू या गावात प्रशासकीय अधिकारी कधी येतात, याची माहिती नागरिकांना होतच नाही. त्यामुळे नेमकी तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी आर. टी. गाढवे यांच्याशी भ्रमणध्वनिद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.
दहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
अवसरी खुर्द गावास 2 ते 3 लाख लिटर पाण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षापासून या परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याने पाइपलाइन आणि पाण्याची टाकी गळणे हे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे अवसरा खुर्द गावचा वपरिसरातील पाणी पुरवठा नेहमीच विस्कळीत होत असतो. याची प्रशासनाने दखल घेऊन तातडीने येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे.
पाच दिवसांपूर्वी विजेच्या कडकडटासह पाऊस झाल्याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचा ट्रान्सफॉर्मर जळाला. तो दुरुस्त करण्यात आला; पण पुन्हा गुरुवारी (दि. 10) झालेल्या पावसाने तो नादुरुस्त झाला. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
– एम. एस. आवरे, कनिष्ठ अभियंता, अवसरी खुर्द