नागपूर – विजय वागधरे नावाच्या संबंधित गुंडाने कुंभारपुरात दुपारी अल्पवयीन मुलाला चाकू मारून जखमी केल्यानंतरही पोलीस कारवाई करत नाही, उलट संध्याकाळी गुंड पुन्हा वस्तीत येऊन शिव्या देतो, हे पाहून जमाव संतापला आणि त्या ठिकाणी हत्येची घटना घडली. दगड, विटांनी ठेचून आणि चाकूने भोसकून विजय वागधरेचा खून करण्यात आला.
पोलिसांनी हत्या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेला फक्त रविवारचंच भांडण कारणीभूत नाही तर गेल्या अनेक महिन्यांच्या गुंडगिरीची आणि त्याबाबद्दल नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर ही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची धक्कादायक पार्श्वभूमी आहे.
धक्कादायक म्हणजे नागरिकांनी सदर घटनेबाबत फक्त स्थानिक पोलीस स्थानकातच तक्रार केली होती असे नाही, तर पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे नागरिकांनी एकदा नव्हे तर दोन वेळेला लेखी तक्रारही केली होती.
मात्र, त्यानंतरही पोलिसांनी गुंड विजय वागधरे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर ठोस कारवाई केली नव्हती. ती झाली असती तर अशी घटना घडलीच नसती, थोडक्यात लोकांनी कायदा हातात घेतला नसता असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.