नवी दिल्ली :- “भारताचे जी 20 अध्यक्षपद, वसुधैव कुटुंबकम – जग एक कुटुंब आहे या तत्त्वज्ञानाभोवती केंद्रीत आहे. जागतिक आरोग्याच्या क्षेत्रात हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे कारण महामारीने आपल्याला शिकवले की ‘प्रत्येकजण सुरक्षित होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही’ असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी केले आहे.
त्या आज जी -20 उपप्रमुख यांच्या बैठकीला संबोधित करत होत्या. जी 20 आरोग्य मंत्र्यांची बैठक उद्यापासून सुरु होत आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीचे आयोजन केले होते. नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ व्ही के पॉल हे देखील यावेळी उपस्थित होते.
भारताच्या जी20 अध्यक्षतेखालील आरोग्य कार्यगटांमधे होत असलेल्या महत्वपूर्ण विचार- विनिमय त्यांनी अधोरेखित केले. आरोग्य विषयक आपत्कालीन स्थिती प्रतिबंधक तयारी आणि प्रतिक्रिया (एचईपीपीआर) याला सुरुवातीपासूनच प्रत्येक जी20 आरोग्य कार्यगटाची मुख्य प्राथमिकता राहिली आहे. हे लक्षात घेता, “भारतीय जी20 अध्यक्षतेने एक आरोग्य, एएमआरच्या (अँटी-मायक्रोबायल प्रतिरोध), आणि हवामान बदल” या महत्वपूर्ण धोक्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे असे त्यांनी सांगितले.
“किफायतशीर वैद्यकीय प्रतिरोधक उपाययोजना सर्वांना समानतेने उपलब्ध व्हाव्यात याची खातरजमा करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने दुसरे प्राधान्य म्हणजे जगभरात संशोधन आणि विकास तसेच उत्पादकांचे जाळे उभारणारे, जागतिक एमसीएम (वैद्यकीय प्रतिरोधक उपाययोजना) समन्वय मंच स्थापन करण्याची गरज. यामुळे जगभरातील सर्वात असुरक्षित विशेषत: ग्लोबल साउथमधील लोकांसाठी दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात लसी, उपचार आणि निदान (VTDs) उपलब्ध करणे शक्य होईल” असे त्या म्हणाल्या.
कोविड-19 महामारीमुळे, महामारीची स्थिती आणखी बिकट होण्यापासून रोखणे आणि भविष्यात अशा महामारीच्या नियोजनासाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्याकरिता तदर्थ जागतिक यंत्रणांचा जलद विकास झाला. तथापि, यामुळे प्रयत्नांमधे बऱ्याचदा पुनरावृत्ती आणि विखंडन झाले असे केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी अधोरेखित केले.
इंडोनेशिया आणि ब्राझीलमधील ट्रोइकाच्या सदस्यांनी आज जगातील प्रमुख आरोग्य आव्हानांना प्राधान्य दिल्याबद्दल भारतीय अध्यक्षपदाचे कौतुक केले. त्यांनी बहु-क्षेत्रीय दृष्टीकोन स्वीकारण्यासाठी आणि चांगल्या आरोग्य प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.