फुरसुंगी – हडपसर-सासवड मार्गावर अनेक ठिकाणी पीएमपी बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. निवाराशेड नाही, आसन व्यवस्थाच नाही, थांब्यामध्ये सर्वत्र राडारोडा, गवत, ड्रेनेजचे पाणी व कचरा पडल्याने, छताचे पत्रे तुटल्याने अशी थाब्यांची स्थिती झाली आहे. यामुळे प्रवाशांना ऊन, वारा, पाऊसात थांबून बसची वाट पहावे लागत आहे. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांचा विचार करून बसथांब्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करीत तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख उल्हास शेवाळे यांनी दिला आहे.
हडपसर-सासवड मार्गावर भेकराईनगर, पॉवर हाऊस, मंतरवाडी, उरुळी देवाची फाटा, वडकी आदी ठिकाणच्य अनेक बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्त्यालगत थांबावे लागत आहे.
हडपसर-सासवड मार्गावर दररोज जीवघेणी वाहतूक कोंडी होत असल्याने कोंडीतून मार्ग काढताना अनेक वाहनचालक आडवीतिडवी वाहने चालवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी रस्त्यालगत बसची वाट पाहात थांबणाऱ्या प्रवाशांना वाहनाची धडक बसुन अपघात घडू शकतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने या मार्गावरील दुरावस्था झालेल्या बसथांब्यांची दुरुस्ती तत्काळ करावी, गरजेच्या ठिकाणी नवे थांबे उभारावेत, अशी मागणी उल्हास शेवाळे यांनी केली आहे.