जालना: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे यांच्या पार्थिवावर जालन्यातील मूळगावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान काल (1 ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शारदाताईंना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात शारदा टोपे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी पाथरवाला येथे काही धार्मिक विधी करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार राजेश राठोड, बालाजी कल्याणकर, प्रकाश गजभिये, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही अंत्यदर्शन घेतले.
शारदा टोपे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. मार्चमध्ये त्या महिनाभर रुग्णालयात दाखल होत्या. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु दोन महिन्यांनी पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.