नाशिक : सप्तशृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठान आणि वैभव आहे. गडावर दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असून येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकही वास्तव्यास आहे. त्यामुळे सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, नाशिक च्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत सप्तशृंगी गडावर 9 कोटी 23 लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, सप्तश्रृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या ठिकाणी दररोज 75 हजार नागरिक असतील आशा अंदाजाने ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून यात्रा उत्सवांचाही विचार करण्यात आला आहे. या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून अडीच लाख लिटरचा जलकुंभ, दिवसाला 22 लाख लीटर शुद्ध पाणी होईल असा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. भवानी पाझर तलावाच्या माध्यमातून येथे काम करण्यात येणार आहे. सिमेंट बंधारा, सुर्यकुंड व गंगा जमुना विहीरिचाही वापर या योजनेसाठी करण्यात येणार आहे. तसेच वीज बिलाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी सोलर प्रणालीचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरें याच्या वतीनेही सप्तश्रृंगी गडाचा पर्यटन दृष्टीने विकास साधण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.