हनमंत चिकणे
उरुळी कांचन -आगामी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे प्रारूप आराखडे चाचणीस्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर गट आणि गणांबाबत संभाव्य उमेदवारांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. कोणते गाव कोणत्या गटात अथवा गणाला जोडले जाणार याची जोरदार चर्चा सध्या उरुळी कांचनसह परिसरात जोर धरू लागली आहे.
भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे समर्थक आपापल्या परीने आराखडे बांधू लागले आहेत. गट आणि गणांची खातरजमा करून घेण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना, प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाशी संपर्क साधत आहे. गाव पातळीवरील ग्रामपंचायतींच्या नंतर मिनी विधानसभा असलेल्या जिल्हा परिषद गटावर अनेक मातब्बर मंडळींच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत सोरतापवाडी -उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात व तर पंचायत समिती गणात राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आघाडी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्ष, शिवसेना आघाडी म्हणून निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढवणार या बाबतचे धोरण स्थानिक पातळीवर घेतले जाणार आहेत. त्यामुळे भाजप एकट्याने लढा देणार हे निश्चित आहे. दरम्यान, हवेलीत आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी व भाजप हे दोन्ही पक्ष समोरासमोर लढणार असल्याने भक्कम राष्ट्रवादीला भाजप कसे आव्हान देते ही निवडणूक ठरविणार आहे.
विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर नुकत्याच झालेल्या भाजपने जिल्हा बॅंक व पीएमआरडीए संस्था निवडणूकीत विजय मिळविल्याने कार्यकर्ते उत्साहात असले तरी वरिष्ठ नेते मात्र सोईस्कर भूमिका घेत असल्याने भाजप कार्यकर्ते सावध भूमिका घेताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत आल्याने प्रचंड आशावादी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक गटात उमेदवारीची चुरस पहायला मिळत आहे.
सर्वपक्षीयांचा लागणार कस
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीतील अनेक इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. परंतु निवडणूक, जागा आरक्षणाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत नक्की कोणाचा नंबर लागणार हे लक्षात येणार नाही. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नवीन चेहरे पाहण्यास मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु ही इच्छुकांची गर्दी रोखण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश येणार का? तसेच उमेदवारीची माळ कोणालाही नाराज न करता कोणाच्या गळ्यात टाकायची यासाठी वरिष्ठांना कंबर कसावी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.