पुणे –शासनाकडून घेतलेल्या जमिनीवर घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे घेतले. यानंतरही घर न देता सभासद व शासनाची तब्बल 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षासह दोघांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास गोटे (वय 70, रा. शिवणे, मूळ शिरुर), गणेश बजरंग माने (वय 42, रा. जोशीवाडी, शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक वेताळ (वय 40, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अंबादास गोटे बांधकाम व्यावसायिक रामनगर सहकारी गृहरचना संस्थेचा अध्यक्ष, तर माने हा सचिव आहे. त्यांनी वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरामध्ये 1990 मध्ये नागरिकांना घरे बांधण्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे साडेचार एक जमीन घेतली होती. त्यासाठी त्यांनी फिर्यादी आणि इतर 218 सभासदांकडून पैसे घेतले.
दरम्यान, संबंधित जमिनीवर 396 सदनिका बांधून त्या सोसायटीच्या सभासदांना न देता, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्याच व्यक्तींना विकल्या. त्याद्वारे सोसायटीचे मूळ सभासद व राज्य शासन यांची सुमारे 200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. गोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनास व न्यायालयास वेळोवेळी खोटी माहिती देऊन त्यांचीही दिशाभूल केली. या गुन्ह्यात गोटे यास त्याच्या अन्य नातेवाईक व इतर व्यक्तींनीही मदत केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असा अर्ज फिर्यादीने पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिला होता.