पुणे – राज्यातील 27 तालुक्यांमध्ये दि.1 जून ते दि.1 सप्टेंबर पर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत 25 ते 50 टक्के पाऊस पडलेला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर आणि हवेली या चार तालुक्यांचा समावेश आहे. राज्यात दि.1 जून ते दि.1 सप्टेंबर अखेर सरासरी 830.5 मिमी इतका पाऊस होतो. प्रत्यक्षात 679.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी 207.6 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात मात्र सरासरीच्या 54 टक्के म्हणजे 11.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात सरासरीच्या 139 टक्के म्हणजे 459 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
तर ऑगस्टमध्ये 38 टक्के म्हणजे 107.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात महसूल मंडल संख्या 156 आहे. यामध्ये 15 ते 21 दिवसांचा पावसाचा खंड पडलेल्या मंडलाची संख्या 18 आहे. तर 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या मंडलाची संख्या 41 आहे.
“बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यांत अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टॅंकर सुरू करावेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र पाठवले आहे. या चार तालुक्यांसोबतच भोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यांतही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत.” – सुप्रिया सुळे, खासदार, बारामती