दौंड- संततधार पावसाने राजेगावला जोडले जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यातच राजेगाव- खानवटे मार्गावर बुधवार (दि.14) रात्री पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मोटारसायकली व चारजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले खानवटे येथील आहेत. सकाळी शोध कार्यात तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.
आप्पासाहेब धायतोंडे (वय 55), कलावती धायतोंडे (वय 48). शाहजी (आप्पा) लोखंडे (वय 52, रा. खानवटे, ता. दौंड), असे मृत्युमुखी झालेल्यांची नावे आहेत. सुभाष लोंढे (वय 48) यांचा शोध सुरू आहे. दौंड तालुक्यात रात्रभर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि रात्री ओढ्याला आलेले नदीचे स्वरूप आक्राळविक्राळ करणारे होते. रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत होते.
या चारजणांनी ओढ्याच्या पाण्यात दुचाकी घातल्या. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते वाहून गेले. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. गुरूवारी (दि. 15) सकाळी पुन्हा वाहतूक सुरळीत झाली आहे. मृतदेहांचा स्थानिक नागरिकांच्या मदतीने सकाळपासून शोध घेतला असता तीन मृतदेह सापडले. या तिघांचे मृतदेह दौंड येथील जिल्हा उप रुग्णालायत शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी दौंडचे तहसीलदार संजय पाटील व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट देऊन पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.