मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सोयीचा व सूकर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा एक दिवस कमी करत चार दिवसांचा सामना करण्याचा विचार सुरू आहे.या प्रस्तावास जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंनी विरोध दर्शविला आहे. त्यात आता या प्रस्तावास भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील यांनीही विरोध दर्शवत ‘हा तर मूर्खपणा आहे’ असे म्हटले आहे. संदीप पाटील मुंबईतील शालेय स्तरावरील हॅरिस शील्ड स्पर्धेच्या पुरस्कार वितरणानंतर माध्यमाशी बोलत होते.
ते म्हणाले, ” पाच दिवसीय कसोटी प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक कसोटी असते. यामध्ये पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यत खेळाडूची कसोटी लागते. दिवसानुसार खेळपट्टी बदलत जाते. अखेरच्या दिवशी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळते, अशावेळी गोलंदाजीचा सामना करणे फलंदाजांसमोर आव्हान असते.”
पुढे बोलताना पाटील म्हणाले,” सचिन तेंडूलकरने जी कसोटी क्रिकेटची समर्पक व्याख्या केली आहे, तेच माझेही म्हणणे आहे. तसेच दिवस-रात्र कसोटीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, दिवस-रात्र कसोटी हा प्रकार आताच सुरू झाला आहे, इतक्या लवकर यावर बोलणं चुकीचं ठरेल.
अायसीसीच्या चार दिवसीय कसोटीस अातापर्यंत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर, ग्लेन मॅकग्रा तसेच सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहली, नॅथन लायन यांनीदेखील विरोध दर्शविला आहे.