राजगुरूनगर येथे इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. नाईक यांची माहिती
राजगुरूनगर- अवकाश तंत्रज्ञान हे खूप क्लिष्ट आहे. भारताने स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरून चांद्रयान मोहिमेत केलेली प्रगती जगभरात कौतुकाची ठरली. चंद्रावर पाणी शोधण्यासाठी अमेरिका, रशिया, चीन व युरोप आदि देशांत स्पर्धा सुरू असताना भारताने चंद्रावर उपग्रह पाठवून तेथे पाणी असल्याचा शोध लावला आणि जगाला तो मान्य करावा लागला. भारताची “चांद्रयान मोहीम 2′ ही बऱ्यापैकी यशस्वी झाली. 2022 मध्ये भारत चंद्रावर 3 अंतराळवीर पाठवणार असून त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर असल्याची माहिती इस्रोचे माजी समूह संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी दिली.
राजगुरूनगर येथे मंगळवारी (दि. 28) “चांद्रयान मोहिमा’ या विषयावर डॉ. नाईक बोलत होते. यावेळी ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सुरेश नाईक म्हणाले की, भारताकडे अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी अनेक प्रगत देश येत असून कमी खर्चात उपग्रह सोडणारा देश म्हणून भारत मान्यताप्राप्त आहे. भारताने आतापर्यंत सुमारे 300 परदेशी उपग्रह अवकाशात सोडले असून एकाच उड्डाणात सुमारे 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक पराक्रम केला आहे. नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेपेक्षा भारताच्या इस्रो या संस्थेचा खर्च हा खूप कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.