दिंहाता (पश्चिम बंगाल) – पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला कुचबिहार येथे झाल्याचे म्हटले जात असून तृणमूल कॉंग्रेस समर्थित गुंडांनी हा हल्ला केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे कुचबिहार येथील दिंहाता येथे भाजपचे नेते आणि कार्यकत्यांची भेट घेण्यासाठी जात होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा दावा केला जात आहे. तसेच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे देखील दाखवण्यात आले.
केंद्रीय मंत्री प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. येथे तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी येथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये एका केंद्रीय मंत्र्यावर अशा प्रकारे हल्ला होत असेल, तर येथे सामान्य माणसाची काय स्थिती असेल, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे. तर भाजपचे दिलीप घोष आणि सुवेंदू अधिकारी यासारखे नेते पश्चिम बंगालमध्ये अशांतता निर्माण व्हावी यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना भडकवत आहेत, असा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे नेते जयप्रकाश मुजूमदार यांनी केला आहे.