ओडिशा राज्यातील बालासोर येथे तीन रेल्वेचा महाभीषण अपघात होऊन 288 पेक्षा जास्त प्रवाशांचा गेलेला बळी ही निश्चितच देशाला हादरवून टाकणारी घटना आहे. देशात एकीकडे ठिकठिकाणी “वंदे भारत’ या अत्याधुनिक ट्रेनची सुरुवात होत असतानाच दुसरीकडे अशा प्रकारचे अपघात होणे म्हणजे रेल्वे प्रशासनातील दोषावर नेमकेपणाने बोट ठेवणे आहे. अशा प्रकारचा कोणताही अपघात होतो तेव्हा नेहमी चौकशीचे आदेश दिले जातात आणि दोषींवर कारवाई करण्याची हमीही दिली जाते. पण या अपघाताचे गांभीर्य पाहता अपघाताच्या कारणांच्या मुळापर्यंत जाऊन अशा प्रकारे पुन्हा अपघात होणार नाही याची काळजी घेण्याचे काम रेल्वे प्रशासनाला करावे लागेल. देशातील रेल्वे अपघाताच्या इतिहासाचा विचार करता हा इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात भीषण अपघात म्हणून नोंदवला गेला आहे. सर्व अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असतानाही हा अपघात झाला आहे.
यापूर्वीचे अनेक अपघात डिजिटल यंत्रणा कार्यरत नसताना झाले आहेत. त्यामुळे त्या घटनांना अनेक वेळा मानवी चुका जबाबदार होत्या; पण आता बालासोर येथे झालेल्या अपघाताच्या कारणांच्या मुळापर्यंत जाऊन अपघात घडण्यास मानवी चुका कारणीभूत आहेत का तांत्रिक चुका, हे बघावेच लागेल. अपघाताच्या बातमीनंतर जी अनुषंगिक माहिती समोर येत आहे ती पाहता अनेक पातळीवर निष्काळजीपणा झाल्यामुळेच हा अपघात झाला. शुक्रवारी ज्या दिवशी हा अपघात झाला त्याच दिवशी राजधानी नवी दिल्लीमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आपल्या सहकाऱ्यांसोबत रेल्वे सुरक्षेच्या विषयावर चर्चा करत होते. पण या बैठकीमध्येसुद्धा रेल्वे सुरक्षेच्या विषयापेक्षाही “वंदे भारत’ या अत्याधुनिक रेल्वेचीच चर्चा जास्त झाली, अशी माहिती समोर येत आहे.
अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडल्यानंतर काही तासांतच बालासोर येथे हा भीषण अपघात घडला. साधारणपणे काही कारणाने एखादी रेल्वे रुळावरून घसरते, पण ती जर प्रवासी रेल्वे असेल तर प्रवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. या अपघातात तब्बल तीन रेल्वे सहभागी होत्या. त्यापैकी दोन प्रवासी रेल्वे होत्या आणि एक मालगाडी होती. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन प्रवासी रेल्वेंपैकी एक रेल्वे प्रथम रुळावरून घसरून मालगाडीला धडकली आणि त्यानंतर शेजारच्या रुळावरून जाणाऱ्या दुसऱ्या प्रवासी रेल्वेलाही धडकली. त्यामुळे या अपघाताची भीषणता वाढली. हा अपघात घडला त्या ठिकाणी रेल्वेचे चार ट्रॅक होते. या चार ट्रॅक पैकी दोन ट्रॅक राखीव होते, त्या ठिकाणी मालगाड्या उभ्या केल्या जातात आणि मधल्या दोन ट्रॅकवरून प्रवासी रेल्वे प्रवास करत असतात.
रेल्वेचे रूळ बदलण्याचे काम ऑटोमॅटिक पद्धतीने होते; पण या यंत्रणेत काहीतरी बिघाड निर्माण झाल्याने एक प्रवासी रेल्वे आपला ट्रॅक बदलून सरळ मालगाडीवर धडकली आणि नंतर ती दुसऱ्या प्रवासी रेल्वेवर धडकली. अपघात कसा झाला याबाबत जरी स्पष्टता असली तरी तो कशामुळे झाला याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. सिग्नल यंत्रणेत काही बिघाड झाला असेल किंवा रेल्वे रूळ बदलण्याच्या यंत्रणेत काही बिघाड झाला असेल तर त्याची माहिती आधीच रेल्वे प्रशासनाला असणे आवश्यक असते. याच झोनवर काम करणाऱ्या काही रेल्वे अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्येच रेल्वेची सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे ट्रॅक बदलण्याची यंत्रणा सदोष असल्याचा अहवाल आपल्या वरिष्ठांना दिला होता. पण त्यानंतरही कोणतीही काळजी घेण्यात न आल्यानेच हा अपघात झाला.
रेल्वेने प्रवास वेळेवर सुरू करणे आणि वेळेवर पूर्ण करणे किती महत्त्वाचे असते तेसुद्धा या अपघाताच्या निमित्ताने समोर आले आहे. कारण या अपघातामध्ये ज्या दुसऱ्या प्रवासी रेल्वेला पहिली प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकल्यानंतर धडकली ती दुसरी रेल्वे तब्बल अडीच तास उशिरा धावत होती. म्हणजेच दुसरी प्रवासी रेल्वे वेळेवर धावली असती तर कदाचित या अपघातात त्या रेल्वेचा सहभाग नसता. अगदी वेळेवर नाही पण काही मिनिटे आधी ती रेल्वे जरी तिथून निघून गेली असती तरी या रेल्वेचा अपघात झाला नसता. भारतात रेल्वे कधीच वेळेवर सुरू होत नाहीत आणि वेळेवर पोहोचत नाहीत. हा नेहमी चेष्टेचाच विषय झालेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली असली तरी लांब पल्ल्यांच्या रेल्वे नेहमीच अडीच ते तीन तास उशिरा पोहोचतात. साहजिकच रेल्वे जेव्हा अशा उशिरा धावत असतात तेव्हा या सर्व रेल्वे मार्गांचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेवरही ताण येतो.
त्यातून काही चूक झाली तर अशा प्रकारचा भीषण अपघात होऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून देशभरातील रेल्वे मार्गांवर कवच व्यवस्था अस्तित्वात आणावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ही व्यवस्था म्हणजे एक प्रकारची अँटी कोलीजन प्रणाली आहे. म्हणजेच प्रवास चालू असलेल्या मार्गावर अडथळा येणार असेल तर त्याची माहिती आधीच मिळते आणि त्याप्रमाणे ब्रेक सिस्टीम कार्यरत होऊन रेल्वे थांबवली जाते किंवा अन्य रुळावर वळवली जाऊ शकते. पण बालासोर येथील या रेल्वे मार्गावर ही कवच योजना अस्तित्वात होती की नाही, याबाबतचा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. रेल्वे मार्गावर एकमेकांसमोर गाड्या येऊन टक्कर होऊ नये यासाठी या रेल्वे गाड्यांमध्ये बहुचर्चित कवच प्रणालीची घोषणा केंद्र सरकारने केली होती. पण दरवर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद न केल्याने देशातील अनेक ठिकाणी ही प्रणाली अद्यापही अस्तित्वात आलेली नाही.
या योजनेवर एकूण 1 लाख 37 हजार कोटी रुपये खर्च करायचे होते आणि देशातील 65 हजार किलोमीटर पसरलेल्या रुळांवर ही प्रणाली लागू करण्यात येणार होती. पण आतापर्यंत निधीअभावी फक्त चौदाशे किलोमीटर रुळांवरच ही योजना सुरू झाली आहे. बालासोर येथेसुद्धा ही यंत्रणा कार्यरत नव्हती, हे उघड आहे. प्रवासी रेल्वे आपला ट्रॅक सोडून जर मालगाडीच्या ट्रॅकवर गेली तेव्हा ही यंत्रणा कार्यरत असती तर या यंत्रणेमुळे रेल्वेचा ब्रेक लागला असता आणि अपघाताची तीव्रता कमी झाली असती, पण तसे झाले नाही. आता या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनामाची मागणी जोर धरत आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होणार नाहीत याकडे अधिक लक्ष द्यावे. “वंदे भारत’ सारख्या अत्याधुनिक आणि देखण्या रेल्वे रुळावरून धावत असतानाच जुन्या रेल्वेकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी आता सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला घ्यावीच लागेल.