महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कधी कोणत्या विषयावर चर्चा सुरू होईल आणि आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जाईल याबाबत काहीही खात्री देता येत नाही. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये विनाकारणच एखाद्या विषयावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात आणि आता याच मालिकेमध्ये अमली पदार्थांच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. अर्थात, राजकीय लढाई जिंकण्यासाठी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात असले, तरी अमली पदार्थांचा विषय निश्चितच गंभीर आहे हे विसरूनही चालणार नाही. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
पुण्यातील ससून रुग्णालयातून पाळलेला ड्रग तस्कर ललित पाटीलचा विषयही ताजाच आहे. साहजिकच राजकीय नेत्यांनी जरी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आरोप प्रत्यारोप सुरू केले असले, तरी अमली पदार्थांच्या विषयाकडे गांभीर्याने पहावे लागणार आहे. ज्या प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबला अमली पदार्थांचा विळखा बसला होता आणि त्याचा मोठा फटका तरुण पिढीला बसला तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात यावी असे वाटत नसेल तर आतापासूनच या अमली पदार्थांच्या तस्करांच्या मुसक्या आवळून हा व्यापार बंद करण्याची गरज आहे. हे वर्ष संपायला आणखीन दीड ते पावणेदोन महिन्याचा कालावधी बाकी असतानाच नववर्षाच्या स्वागताच्या आणि वर्षअखेरीच्या पार्ट्यांचे नियोजन आतापासूनच केले जाते. केवळ महाराष्ट्रच नाही तर देश पातळीवर सर्वत्रच अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा वापर केला जातो.
अमली पदार्थांच्या व्यापाराचा विचार करता याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची वाहतूक केली जाते आणि खरेदी विक्री पण केली जाते. आधुनिक काळामध्ये पार्ट्या करणे हा तरुणाईच्या जीवनशैलीचा एक भाग बनला असल्याने अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये केवळ मद्याचाच वापर केला जातो असे नाही, तर घातक असे अमली पदार्थसुद्धा या पार्ट्यांमध्ये वापरले जातात, असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमली पदार्थांचा वाढत चाललेला हा विळखा सोडवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे लागणार आहेत. आतापर्यंत सीमेवरील पंजाब तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील अमली पदार्थांच्या व्यापाराच्या बातम्या प्रसिद्ध होत असत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर पंजाबमध्ये अमली पदार्थांचा व्यापार हाच मुख्य प्रचाराचा मुद्दा झाला होता.
अमली पदार्थांच्या व्यापाराचा आणि वाहतुकीचा विचार करता अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान हा एक अमली पदार्थांच्या व्यापारातला गोल्डन ट्रॅंगल मानला जातो. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा कच्चामाल तयार केला जातो आणि तेथूनच सर्वत्र पाठवला जातो. पंजाब वगैरे राज्यांच्या सीमाच पाकिस्तानला लागून असल्याने या अमली पदार्थांची तस्करी सीमेवरील प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे लक्षात येत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात समुद्र सीमांचा वापर करूनही समुद्रमार्गे अमली पदार्थांची तस्करी केली जाऊ शकते. गेल्या काही कालावधीमध्ये गुजरात पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करून अमली पदार्थ व्यापार करणाऱ्या अनेकांना जेरबंद केले असले, तरी अशाप्रकारे पकडण्यात आलेले गुन्हेगार हे छोटे मासे असतात.
यांचे जे मुख्य सूत्रधार आहेत ते नेहमीच नेपाळ, मलेशिया किंवा इतर देशांमधून सूत्रे चालवत असतात. साहजिकच या छोट्या माशांच्या मदतीने या मोठ्या माशांपर्यंत पोहोचण्याचे काम आता पोलिसांना करावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या सर्वच घटकांना जेरबंद करावे लागणार आहे. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या आघाडीच्या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाप्रमाणे, पदार्थांच्या व्यापारामध्ये अनेक वेळा राजकीय नेतेसुद्धा गुंतलेले असतात. त्यांची ही गुंतवणूक केवळ अमली पदार्थांची वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून असते असेही समोर आले आहे. अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी अनेक वेळा राजकीय नेत्यांच्या संबंधांचा आणि दबावाचा वापर केला जातो अशा प्रकारची राजकीय नेते आणि अमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील ही अनिष्ट युती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अमली पदार्थांचा व्यापार आणि वाहतूक सुरूच राहणार आहे.
हे घातक पदार्थ तरुण पिढीपर्यंत पोहोचतच राहणार आहे. या संस्थेने आपल्या अहवालात जी माहिती प्रसिद्ध केली आहे त्याप्रमाणे भारतात 15 ते 45 या वयोगटातील लोकसंख्येला अमली पदार्थांचे सर्वात जास्त व्यसन लागले आहे. 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लहान मुलांनासुद्धा अमली पदार्थांचे आकर्षण वाटत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे अमली पदार्थांच्या वापरामुळे केवळ आरोग्यावर परिणाम होतो असे नाही, तर संपूर्ण आर्थिक नियोजनही बदलून जाते. अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागत असल्याने अनेकदा दैनंदिन गरजा बाजूला ठेवून व्यसनी लोक फक्त अमली पदार्थांवरच खर्च करत असतात. अमली पदार्थांसाठी जर पैसे उपलब्ध झाले नाहीत तर अनेक वेळा असे व्यसनी लोक गुन्हे करायलासुद्धा प्रवृत्त होतात. म्हणजेच ही एक मोठी साखळी आहे ज्याचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होऊ शकतो.
साहजिकच येत्या काही कालावधीमध्ये केवळ महाराष्ट्र सरकारच नव्हे तर भारत सरकारनेसुद्धा अमली पदार्थांचा घट्ट होऊ पाहणारा हा विळखा सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. कारण अमली पदार्थांच्या व्यापाराला दहशतवादी कारवायांची किनारही असते हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. अमली पदार्थ व्यापारातून मिळालेला पैसा अनेकदा दहशतवादी कृत्ये करण्यासाठी वापरला जातो हे एक उघड सत्य आहे. म्हणूनच या विषयातील राजकीय चिखल फेक थोडी बाजूला जरी ठेवण्यात आली तरी या विषयाच्या मुळापर्यंत जाणे हीच सध्याची गरज आहे. देशातील सर्व राज्यातील पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांनी एकमेकांशी सहकार्य करूनच हा अमली पदार्थांचा विळखा सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.