लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान संपेपर्यंत जो प्रचार झाला तो बर्यापैकी संयमी स्वरूपाचा होता. या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर काय चक्रे फिरली कोणास ठाऊक; पण पुन्हा देशात धार्मिक विद्वेषावर आधारित प्रचाराला सुरुवात झाली आहे. याची सुरुवात अर्थातच भाजप नेत्यांनी केली असून त्यात खुद्द पंतप्रधानांनी पुढाकार घेतलेला दिसला आहे. काँग्रेसने देशातील सर्वसामान्यांची संपत्ती काढून घेऊन, ती त्यांनी अल्पसंख्याकांना म्हणजेच मुस्लिमांना देण्याचा निर्धार केला आहे, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातल्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचाच असल्याचे म्हटले होते व काँग्रेस त्याच मार्गावर चालली आहे. आता काँग्रेसवाले सत्तेवर आल्यावर तुमच्या संपत्तीची माहिती घेतील, तुम्ही गावाकडे एक आणि शहरात एक घर घेतले असेल तर त्यातील एक घर ते जप्त करतील, तुमच्या घरी असलेले स्त्रीधन ते पळवतील अगदी तुमच्या महिलांच्या अंगावर असलेले मंगळसूत्रही ते काढून घेतील आणि ती सारी संपत्ती ज्यांना जादा मुले आहेत अशा घुसखोरांना देतील आणि हे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातही लिहिले आहे, अशी भयंकर स्वरूपाची विधाने पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभेमध्ये केली आहेत.
काल त्यांची ही विधाने सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर त्याला काँग्रेससह सर्वच विरोधकांनी कडकडून आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने या संबंधात निवडणूक आयोगाकडेही रितसर तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोदी म्हणतात तसले काहीही नाही हे मोदींना प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा निर्धार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला असून त्यांनी मोदींना पत्र पाठवून त्यांच्या भेटीची वेळही मागितली आहे. एवढेच नव्हे तर देशभरातील काँग्रेसजनांनी काँग्रेसचे निवडणूक घोषणापत्र टपालाने मोदींच्या घरी पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोदींकडून करण्यात आलेली वक्तव्ये अवास्तव आहेत, लोकांना नाहक घाबरवणारी व त्यांच्यात भ्रम निर्माण करणारी आहेत, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यापर्यंत मोदी हे काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि त्यांचा परिवारवाद याच मुद्द्यांच्या मर्यादेत राहिले होते. पण पहिल्या टप्प्यातच भाजप आघाडीला दणकून फटका बसल्यानंतर ते आता पुन्हा हिंदू-मुस्लीम या धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळले आहेत असाही त्यांचा आरोप आहे. तो बहुतांशी खरा आहे, असे मानायला जागा आहे.
अन्यथा मोदींना प्रचारसभांमध्ये असा अचानक आक्रस्ताळेपणा करण्याची गरज भासली नसती हेही तितकेच खरे आहे. पंतप्रधानांनी मुस्लिमांना उद्देशून घुसखोर, जास्त मुले असलेले लोक असे शब्द प्रयोग वापरले आहेत म्हणजे त्यांचा रोख नेमका कोणावर असावा यावर वेगळा उहापोह करण्याची गरज नाही. यावेळी मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर काँग्रेसची बाजू उचलून धरण्यासाठी त्यांच्या मित्र पक्षांचे नेतेही तातडीने धावले आहेत. त्यात स्टॅलिन, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, संजय राऊत, ओमर अब्दुल्ला अशा अनेकांचा समावेश आहे. असदुद्दीन ओवैसी यांनीही मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुस्लिमांना जास्त मुले असतात या मोदींच्या विधानांच्या अनुषंगाने खुद्द मोदींच्या घरी त्यांची सहा भावंडे आहेत, अमित शहांचीही तितकीच भावंडे आहेत असे दाखलेही या नेत्यांकडून दिले गेले. हा विषय इथेच थांबलेला नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, माजी पंतप्रधान नरसिंहराव अशा विभूतींना किती भावंडे होती याचेही दाखले विरोधकांकडून पुढे केले गेले. हा सारा प्रकार अभूतपूर्व होता.
मोदींची प्रचारशैली ही धडाकेबाज असते. आपल्या विधानांनी ते समस्त विरोधकांना त्यावर बोलणे भाग पाडतात आणि प्रचाराचा सारा रोख ते एका फटक्यातच बदलून टाकतात. महागाई, बेरोजगारी, इलेक्टोरल बाँडमधील गैरव्यवहार, मोदींच्या श्रीमंत उद्योगपतींवर केली गेलेली खैरात असे मुद्दे विरोधकांकडून पुढे केले जात होते, पण या मुद्द्यांचा रोख बदलण्यासाठी मोदींनी विरोधकांना आपल्या वक्तव्यांनी सैरभैर करून टाकले आहे. राजकारणाच्या खेळ्या म्हणून असा प्रकार करणे कदाचित काही जण रास्त ठरवतीलही पण ते कितपत बरोबर आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. काँग्रेस महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून घेऊन ते घुसखोरांना देण्याच्या विचारात आहे अशा स्वरूपाची विधाने मात्र पूर्ण अवास्तव आणि अश्लाघ्य स्वरूपाची आहेत हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या घोषणापत्रांत याचा उल्लेख आहे असे विधान त्या ओघात करणे हाही एक फाजीलपणाचाच प्रकार मानला पाहिजे. कालच्या विधानावर इतकी सारी प्रतिक्रिया येऊनही आज दुसर्या दिवशीही मोदी पुन्हा त्याच रोखाने प्रचार करताना दिसले आहेत.
काँग्रेस एससी-एसटींचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिमांना देत आहे असे त्यांनी आज म्हटले आहे. मोदींनी काँग्रेसवर आरोप करण्यासाठी म्हणून ही जी विधाने केली आहेत त्याला काहीही आधार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या काही विधानांचा असा टोकाचा अन्वयार्थ लावून मोदी आक्रमक झाले आहेत. देशातील जनतेचे आर्थिक, सामाजिक आणि जातनिहाय सर्वेक्षण करून ज्यांची जितकी लोकसंख्या त्यांची तितकी भागीदारी हे सूत्र काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात स्वीकारले असून गेले अनेक महिने राहुल गांधी हा मुद्दा मांडत आहेत. मोदींच्या राजवटीत समाजात आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली आहे हे अनेक अहवालांतून दिसून आले आहे. देशातील 70 टक्के जनतेकडे जितकी संपत्ती आहे तितकी संपत्ती देशातल्या एक टक्का लोकांच्या हातात एकवटली आहे ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही.
मग ठरावीक वर्गाच्या हातातच देशाची संपत्ती एकवटणार असेल तर उपेक्षित वर्गाला त्या संपत्तीत अधिकार मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडणे याचा अर्थ लोकांची संपत्ती हिसकावून घेऊन ती जादा मुले असलेल्या घुसखोरांच्या हातात देणे असा होत नाही. दुसर्या एका सभेत मोदी म्हणाले आहेत की, ही माओवादी स्वरूपाची विचारसरणी आहे. कम्युनिस्टांनी ही विचारसरणी जोपासली होती त्यातून जगातल्या अनेक देशांचे नुकसान झाल्याचा दाखला देताना मोदींनी विरोधकांची तुलना अर्बन नक्षलींशीही केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांना विरोध करताना त्यावर तात्विक आक्षेप घेणे समजू शकते; पण त्याचा भलताच अन्वयार्थ लावून पुन्हा समाजात ध्रुवीकरण करून अस्वस्थता निर्माण करणे हे मात्र पंतप्रधानांना शोभलेले नाही एवढेच या निमित्ताने नमूद करायचे आहे.