कराड -केंद्र व राज्य सरकारने परराज्यातील नागरीकांना त्यांच्या राज्यात जाण्याची मुभा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या 24 तासात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणहून सुमारे एक हजार ऑनलाईन अर्ज भरले गेले आहेत. यावरून परप्रांतीय नागरीकांना घरची किती ओढ लागली आहे, हे अधोरेखित होते.
गुजरात, पश्चीम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू अशा वेगवेगळ्या राज्यातील नागरीक कराड परिसरात व्यवसाय व नोकरी निमित्ताने आलेले आहेत. त्यांच्या जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. मात्र, गावी परतण्यापूर्वी डॉक्टरांचा करोनाची लागण नसल्याचा दाखला अत्यंत महत्वाचा आहे. तो दाखला मिळवण्यासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात लोकांनी गर्दी केली. आज पहिल्या दिवशी गुजरात व राजस्थान येथे जाणाऱ्यांसाठी दाखला देण्याची सोय उपजिल्हा रुग्णालयात केली असून दुसऱ्या दिवशी अन्य राज्यात जाणाऱ्यांसाठी दाखले वाटप होणार आहे.
जिल्ह्यात वेगवेगळ्या कामांसाठी देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून परप्रांतीय मोठ्याप्रमाणात येतात. त्यांची संख्याही मोठी आहे. व्यवसायाच्या वेगवेगळ्या पध्दतीनुसार ती संख्या जवळपास लाखात आहे. करोनामुळे त्या सगळ्यांच्या हाताला येथे काम नाही. त्यामुळे सगळ्यांना त्यांच्या मुळगावी जाण्याची आस लागली आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चीम बंगाल, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू या राज्यातील नागरीक वेगवेगळ्या कामानिमित्त जिल्ह्यात स्थायिक आहेत. त्यामध्ये सोनारासाठी नक्षीकाम करणारे, बांधकाम क्षेत्रातील कामगार, सुतार काम करणारे कारागीर, इंटेरिअर डेकोरेशनसाठीचे कारागीर, खाणीवरील काम करणारे, वीट भट्टीवरील मजूर आदींचा त्यात समावेश आहे. यांच्यापैकी बहुतांशी परप्रांतीयांचे कुटूंब त्यांच्या मुळगावी आहेत. तर ते येथे एकटेच राहत आहेत.
त्यांची येथे सोय त्यांच्या ठेकेदारांसह शासनानेही केली आहे.
लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने हे सर्व परप्रांतीय बुचकुळ्यात पडले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्याची आस लागली आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून परवानगी मिळावी, यासाठी झटत आहेत. शासनाने परप्रांतायांना घरी जाण्यास मुभा देणार असल्याचे कालच जाहीर केले. त्यास जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल एक हजारपेक्षाही जास्त परप्रांतीयांनाही त्यांना घरी परत जाण्यासाठी ऑनलाआईन अर्ज केले आहेत. जिल्हाभरातून दाखल झालेल्या अर्जामध्ये उत्तरप्रदेश, बिहार व कर्नाटकात परवानगी मागणारे अर्ज आहेत. आजच्या दुसऱ्या दिवशीही परवागी मागणारे अर्ज दाखल होत होते. एकट्या कराड तालुक्यातून किमान 450 अर्ज कालच्या दिवसभरात दाखल झाले. डॉक्टरचे सर्टीफीकेट, पोलिसांचा ना हरकत दाखला व प्रांताधिकारी यांची शिफारस असलेली कागदपत्रे त्यासाठी लागतात. त्यात डॉक्टरांचा करोनाची लागण नसल्याचा दाखला अत्यंत महत्वाचा आहे.