द्विपक्षीय संबंध धोक्यात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली- भारताबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध धोक्यात असल्याचे जगाला दाखवण्याचा प्रयत्न केल्याची टीका आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने करण्यात आली. पाकिस्तानने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने करण्यात आली आहे. भारताबरोबरचे संबंध तोडून टाकण्याचे पाकिस्तानने उचललेले पाऊल खेदजनक आहे. जम्मू काश्मीरबाबत भारत सरकारचा निर्णय पूर्णपणे अंतर्गत व्यवहार आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला ठणकावले आहे.
भारताने विकासासाठी उचललेल्या पावलाकडे पाकिस्तान नकारात्मक दृष्टीकोनातून बघणे आश्चर्य वाटावे असे नाही. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाच्याबाबतही अशाच भावना व्यक्त केल्या होत्या. भारतीय राज्यघटना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातही सार्वभौम असणार आहे. इशाऱ्याच्या दृष्टीकोनातून त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.