मुंबई – भारताचा नवोदित क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने तीन वर्षांपूर्वी घडलेल्या बंदी असलेल्या खोकल्याच्या औषधाच्या सेवनप्रकरणी पहिल्यांदाच जाहीर मत व्यक्त केले आहे. या औषधात बंदी घातलेल्या उत्तेजक द्रव्याचे अंश सापडल्यामुळे त्याच्यावर आठ महिन्यांची बंदीही लावली गेली होती. मात्र, स्वतःची चूक कबूल करण्याऐवजी त्याने या औषधाच्या सेवनाला आपल्याच वडिलांना दोषी धरले आहे.
शॉने आपल्या कारकिर्दीतील सर्वात बिकट प्रसंगाला उजाळा देताना वडिलांवरच आरोप केल्याने भारतीय क्रिकेटमध्ये नवे वादळ निर्माण होणार आहे. 2018-19 साली मी एका मालिकेत खेळत होतो. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेवर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. अचानक मला पायाला दुखापत झाली. तिसऱ्या कसोटीत मी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी फिजिओ व संघ व्यवस्थापनाने खूप सहकार्य केले. परंतु मला खूप वेदना होत होत्या. जेव्हा मी मायदेशी परत आलो, तेव्हा मी उपचार घेत असूनही आयपीएल खेळलो. पण त्याचवेळी मला खोकला झाला व म्हणून मी कफ सिरप घेतले. यासाठी माझ्यासह माझे वडीलही जबाबदार आहेत.
इंदूरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळताना मला खोकल्याचा आणि सर्दीचा खूप त्रास झाला होता. मी जेवायला गेलो होतो, पण मला खूप खोकला होता. हे मी वडिलांना सांगितले. त्यांनी मला सांगितले, बाजारात उपलब्ध असलेले कफ सिरप घे. मी माझ्या फिजिओशी सल्लामसलत केली नाही आणि ती माझी चूक ठरली. मात्र, त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्या फिजिओंशी बोलून योग्य ते औषध सुचवायला हवे होते, असे सांगून शॉ याने आपल्या वडिलांनाच लक्ष्य केले.
मी दोन दिवस ते सिरप घेतले व तिसऱ्या दिवशी झालेल्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत मी बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले व मी पॉझिटिव्ह आढळलो. मी या सर्व गोष्टींपासून दूर राहण्यासाठी लंडनला गेलो. तिथेही मी माझ्या खोलीतून फारसे बाहेर पडलो नाही, असे पृथ्वीने सांगितले. देशांतर्गत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पृथ्वीला त्याच्या मैदानाबाहेरील वर्तनावरूनही अनेकदा भारतीय संघातील स्थान गमवावे लागले आहे.