नवी दिल्ली – देशात सुरु असलेल्या करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका राजधानी दिल्लीला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. अशातच आज येथील लोक नायक जय प्रकाश हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी, दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयामध्ये ४० लहान मुलांना करोनाचा गंभीर संसर्ग झाल्याने दाखल करण्यात आले होते, अशी माहिती दिली. यातील १५ रुग्ण मुलं ही एका वर्षाखालील होती असंही ते म्हणाले.
डॉक्टर उर्मिला जांब यांनी दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोव्हीडबाधित बालकांच्या माहितीचा अभ्यासकेल्यानंतर, ‘दुसऱ्या लाटेमध्ये बालकांना मोठ्या प्रमाणात करोनाबाधा होतेय असं आढळून आलं नाही. मात्र याचा अर्थ तिसऱ्या लाटेतही बालकांना बाधा होणार नाही, असा होत नाही’ असं निरीक्षण नोंदवलं. त्या लोक नायक जय प्रकाश हॉस्पिटलच्या बालरोग विभागात वरिष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.
गतवर्षी मार्चपासून डिसेंबरपर्यंत ४०० बाधित बालकांना येथे दाखल करण्यात आलं होत असंही त्यांनी सांगितलं.
“१ एप्रिलपासून सुरु झालेल्या करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ४० बालकांना गंभीर संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १५ बालके एका वर्षाखालील होती. यावेळी आम्ही केवळ ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या बालकांनाच दाखल करून घेतले. त्यामुळे यावेळी दाखल करून घेण्यात आलेल्या बालकांची संख्या कमी आहे.”
यावेळी त्यांनी महिन्याभरापूर्वी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिन्याभराच्या बालकाचा मृत्यू झाल्याचेही सांगितले. सदर बालकास गंभीर स्वरूपाचे डिहायड्रेशन होते. बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दोन तासातच मृत्यू झाला असेही त्यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका?
याबाबत बोलताना डॉक्टर उर्मिला जांब यांनी, दुसऱ्या लाटेतून बालकांसाठी ही लाट अधिक धोकादायक असेल असे संकेत मिळत नसले तरी असे होणारच नाही असे भाकीत करणे चुकीचे ठरेल. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना करोनाचा अधिक संसर्ग झाला अशी पुस्तीही त्यांनी जोडली.