जेजुरी- सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीची जाणीव ठेवत आणि सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत जेजुरी देवसंस्थानच्या वतीने गोरगरीब निराधार, व भिकारी, बेरोजगारांना मदतीचा हात म्हणून गेली 10 दिवसांपासून अन्नसेवा सुरू केली आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने बंद असून बहुतांश कारखान्यांचे संचालक, व्यवस्थापक, ठेकेदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे कामगारांची विशेषतः परप्रांतीय नागरिकांची आजची परिस्थिती रामभरोसे आहे, असे सुमारे 300हुन अधिक कामगार उपासमारीचा सामना करत होते. सलग दोन दिवस कोणतीच व्यवस्था न झाल्याने काही कामगारांनी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांची भेट घेत परिस्थिती कथन केली. मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनाशी संपर्क साधत मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याबाबत तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आणि मंगळवार (दि. 31)पासून रोज दोन वेळा अन्नसेवा सुरू करण्यात आली. देवसंस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेले अन्नसेवा पुरविण्याचे हे दुसरे युनिट असून सुमारे 1200 नागरिकांना ही सेवा पुरविण्यात येत आहे.
कारखानदार, ठेकेदारांनी जबाबदारीचे पालन करावे
सध्या जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय कामगारांची अवस्था दयनीय आहे. त्यांच्यासाठी हे आरोग्याचे आणि पोटाचे युद्ध आहे. देवसंस्थान कोणत्याही कामगार व गरिबाला उपाशी राहू देणार नाही; मात्र येथील कारखानदार व ठेकेदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीची जाणीव ठेवत पुढे येत मदतीचा हात देणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी केले.