नगर – महाराष्ट्राची लोककला देशाला प्रेरणा देणारी ठरली आहे. या माध्यमातून विविध विषयाबाबत जनजागृती होत आहे. त्यामुळे शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला पारंपरिक कला संस्कृतीची ओळख निर्माण होईल, असा विश्वास शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
शब्दगंध साहित्य परिषदेच्या पुढाकाराने होत असलेल्या 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची पारंपरिक ग्रंथ दिंडी व लोक जागर साहित्य यात्रेचा शुभारंभ आ. जगताप व संमेलन अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे,
शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, प्रा. माणिक विधाते, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनील मामा कोतकर, मनीष साठे उपस्थित होते. शब्दगंध साहित्य संमेलनानिमित्त लोकजागर साहित्य पालखीत पुस्तके ठेवण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेफ त्यानंतर यात्रेला सुरुवात करण्यात आली.