दिफू – आसामात दिमा हसाओ जिल्ह्यात पाच ट्रकचालकांची हत्या करून त्यांचे ट्रक जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मीच्या गनिमांनी हा प्रकार केल्याचा संशय आहे. रंगेरबील भागात हे ट्रक रस्त्यावर लाइनमध्ये उभे असताना या गनिमांनी ट्रकचालकावर अचानक गोळीबार सुरू केला.
गोळीबारात दोन ट्रकचालक ठार झाले तर अन्य तीन ट्रकचालक गनिमांनी ट्रक पेटवून दिल्याने त्यात होरपळून मरण पावले. हे ट्रक कोळसा वाहतूक करीत होते. या गनिमांनी ट्रकचालकांकडून खंडणी मागितली होती.
ती देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा ट्रकमालकांनी केला आहे. या भागातून कोळसा किंवा अन्य मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना संरक्षण देण्यासाठी पुरेशी सुरक्षा तैनात करावी, अशी मागणी ट्रकमालकांच्या संघटनेने केली आहे.