ऑनलाइन अर्ज केला; मात्र कागदपत्रे अजूनही स्वत:कडेच
पुणे – महापालिकेकडून शहरातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना लोक शाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजना आणि भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत अनुक्रमे 15 आणि 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यातील अवघ्या 5 हजार विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन भरलेल्या अर्जाची आणि त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची प्रत महापालिकेकडे जमा केली आहे. तर सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरले असून अद्याप ते सबमिट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे सुमारे पाच हजार अर्ज वेळेत दाखल न झाल्यास या मुलांना हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागणार आहे.
महापालिकेकडून दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. या वर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि 11वी प्रवेशाला होणारी दिरंगाई लक्षात घेऊन पालिका प्रशासनाकडून 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुलांचे अर्ज ऑनलाइन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची प्रत आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रत महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, सुमारे 8 हजार अर्ज ऑनलाइन सबमिट झाले असले, तरी क्षेत्रीय कार्यालयाकडे फक्त 5 हजारच अर्ज आले आहेत. तर अजूनही तीन हजार विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज केलेल्या मात्र, अद्यापही अर्जाची प्रिंट आणि कागदपत्रे सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीनं सादर करावीत, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी केले आहे. तसेच ही कागदपत्रे सादर न केल्यास शिष्यवृत्ती देता येणार नसल्याचेही ते म्हणाले.
अडीच हजार अर्ज ड्राफ्टमध्येच
सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्वरूपात अर्ज केले असून ते अद्याप सबमिट केलेले नाहीत. त्यामुळे हे अर्जही तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून सादर करावेत, असे आवाहन इंदलकर यांनी केले आहे. अर्ज ऑनलाइन सबमिट करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंतच असून विद्यार्थ्यांनी तातडीनं अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता करून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आहावनही त्यांनी केले आहे.